आबा साळुंखे यांचे जीवन व कार्य आदर्शवत – ह.भ.प. प्रा. सखाराम महाराज कर्डिले

संजय उकिरडे
श्रीरामपूर दि 21/03/2026
माणूस प्रामाणिक आणि विश्वासार्ह जीवनातून समाधानी होतो, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, याप्रमाणे आबा साळुंखे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कृषीसेवक म्हणून असलेले जीवन व कार्य आदर्शवत असल्याचे मत ह.भ.प. प्रा. सखाराम महाराज कर्डिले यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील बेलापूर रोडवरील काळे पाटील लॉन्स परिसरात आबा साळुंखे यांच्या जीवन कार्याचा सत्कार करताना प्रमुख पाहुणे म्हणून हभप प्रा. सखाराम महाराज कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड्. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रारंभी वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत व प्रास्ताविक करून पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आबा साळुंखे यांचा शाल, बुके, पुस्तके, भेटवस्तू देऊन सन्मान केला. माजी प्राचार्य किसनराव वमने यांनी वडाळा महादेव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील शेती कार्यातील आबा साळुंखे यांच्या तपस्वी, प्रामाणिक, समर्पित कार्याचा मोठेपणा सांगितला. हभप प्रा. कर्डिले महाराज यांनी विविध अभंगातील संदर्भ सांगत संतत्वाचा आणि सेवाभावांचा आदर्श सांगत आबा साळुंखे, प्राचार्य शेळके, डॉ. बाबुराव उपाध्ये, किसनराव वमने, सुखदेव सुकळे यांच्याही आठवणी सांगितल्या.
विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी ॲङ् रावसाहेब शिंदे तसेच नाना साळुंखे व आबा साळुंखे यांच्या प्रामाणिक सेवाभावाच्या आठवणी सांगून अशी प्रांजळ माणसे हीच सेवेचे तीर्थस्थळे असल्याचे सांगून आबा साळुंखे यांच्या आदर्श कार्याबद्दल सत्कार केला. याप्रसंगी देवराम शिंदे, दगडू लक्ष्मण शिंदे, आत्माराम ताराणी यांनी आबा साळुंखे यांचा गौरव केला.
प्राचार्य शेळके यांनी अध्यक्षीय भाषणातून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शैक्षणिक सेवाभाव आणि निरपेक्ष रयतनिष्ठा याविषयी आठवणी सांगितल्या. मी रयतचा विद्यार्थी नसलो तरी मी रयतनिष्ठ सेवकांमुळे रयतमय झाल्याचे सांगितले.ॲङ् रावसाहेब शिंदे यांच्यामुळेच मी श्रीरामपूरकर झाल्याचे सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. अमोल ‘ नरवडे यांनी नियोजनात भाग घेतला तर देवराम शिंदे यांनी आभार मानले.



