राळेगणसिद्धी तील ग्राम परीवर्तन दिन राज्यभरात राबवणार – गिरीश महाजन–

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
पारनेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ जे समाजोपयोगी व प्रेरणादायी आदर्श उपक्रम राबवित आहेत, ते विविध जातीधर्मांच्या भिंती नष्ट करणारे व मानवतावादी आहेत. हे उपक्रम राज्यभर राबवण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे
राळेगणसिद्धी येथे मातोश्री लक्ष्मीबाई हजारे स्मृतिदिन निमित्ताने ग्रामपरिवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर ,प्रांताधिकारी सुधाकर भोसले,विश्वनाथ कोरडे, सुजीत झावरे, वसंत चेडे, सरपंच लाभेश औटी,सुरेश पठारे, दादा पठारे, जयसिंग मापारी, बाबासाहेब चेडे, भागवत पठारे, सुभाष पठारे, राहुल खामकर, दत्ता आवारी,गणेश कावरे आदी उपस्थित होते.
अण्णा हजारे म्हणाले, की राळेगणसिद्धी, हिवरेबाजार येथील ग्रामस्थांनी जे काम केले आहे, त्याचा गुणाकार झाला पाहिजे. आज गावागावात द्वेषभावना वाढत आहे. त्यासाठी संपूर्ण गावाने मतभेद विसरून गावाचा वाढदिवस साजरा केल्यास सामाजिक सद्भावना निर्माण होण्यास मदत होईल. 101 वर्षाचे चंद्रभागा भाऊ पठारे यांचे ग्राममाता म्हणून तर माधव भिवा आवारी यांचे ग्रामपिता म्हणून पूजन करण्यात आले. वर्षभरात जन्माला आलेल्या 30 नवजात बालकांचे अंगडेटोपडे देऊन स्वागत करण्यात आले. तर 14 नववधूंचे ओटीभरण करून स्वागत करण्यात आले. राळेगणसिद्धीच्या लौकिकात भर घालणारे वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ. गणेश पोटे, युवा उद्योजक संतोष तुकाराम मापारी, संतोष सहादू मापारी, प्रगतीशील शेतकरी गणेश मापारी, दिपक पठारे, दूध उत्पादक एकनाथ मापारी, विश्वनाथ गावडे, गुणवंत विद्यार्थी जय पोटे, सिद्धेश मापारी, राष्ट्रीय नेमबाज शार्दूल उगले, निवृत्त सैन्य अधिकारी ठकसेन पठारे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल जाधव, राहूल गाजरे, नाना आवारी, गुणवंत शिक्षक भाऊसाहेब धावडे, राजेंद्र पोटे व गणेश भोसले यांना राळेगणसिद्धी गौरव पुरस्कार देण्यात आला. सरपंच लाभेश औटी व माजी सरपंच जयसिंग मापारी यांनी आयोजित केलेल्या नेत्ररोग उपचार, रक्तदान शिबीरास मोठा प्रतिसाद मिळाला.