ग्रामीण तरुणांनी उद्योजक होण्याचे स्वप्न पहावे-उद्योजक नितीन हासे

अकोले/प्रतिनिधी–
आज शैक्षणिक क्षेत्रात सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. परंतू रोजगार मिळत नसल्यामुळे तरुणांमध्ये वैफल्य निर्माण होऊन तो नोकरी मिळवण्यासाठी धडपड करीत आहे.त्यामुळे मिळवलेल्या शिक्षणाचे अवमूल्यन होत आहे .त्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता उद्योजक होण्याचे स्वप्न पहावे “असे प्रतिपादन सह्याद्री
ॲग्रोव्हेट कंपनी लिमिटेड, संगमनेर चे उद्योगपती नितिन हासे यांनी केले.
ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ आणि ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ” कौशल्य विकास पूरक शिबिराच्या ” उद्घाटन प्रसंगी ” उद्योजक कसे बनावे “या विषयावर प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख हे उपस्थित होते.
आपल्या पुढील भाषणात उद्योजक असे म्हणाले की,” आदर्श उद्योजक होण्यासाठी संयम,कष्ट करण्याची प्रवृत्ती, अनुभव प्रामाणिकपणा, त्याग, आणि ध्येय प्राप्तीसाठी धडपड व संकटावर मात करण्याची तयारी या गोष्टींची आवश्यकता असते.व हे सर्व गुण ग्रामीण भागातील तरुणांमध्ये आहेत त्यामुळे त्यांनी उद्योजक बनून इतरांना रोजगार द्यावा “असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एल.बी.काकडे यांनी केले, व प्रमुख अतिथींचा परिचय प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी करून दिला. या शिबिरात प्रगतशील शेतकरी बाळू घोडे यांचे “आधुनिक शेती ” भाग्यश्री बोराडे यांचे ” बचत गट आणि कुटीर उद्योग” तसेच डॉ. लहू काकडे यांचे ” पर्यटन उद्योग ” या विषयावर व्याख्याने संपन्न झाली. प्रमुख अतिथींचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विभागाचे समन्वयक डॉ. वाल्मीक गिते यांनी केले तर आभार प्रा.राजेंद्र कासार यांनी मानले. या शिबिरामध्ये १५० विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.