शालेय जीवनातील पारितोषिके जीवन प्रवासात प्रेरणादायी ठरतात – गटविकास अधिकारी राजेश कदम

आबासाहेब काकडे विद्यालयात आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रम
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
व्यक्तीने आपल्या शालेय जीवनात मिळवलेला सन्मान हा त्याच्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान असतो. तसेच शालेय जीवनातील पारितोषिके ही व्यक्तीच्या भावी जीवनासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरतात असे प्रतिपादन शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी आबासाहेब काकडे विद्यालयात आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी केले.
आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगाव येथे कर्मयोगी जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे यांच्या जयंती माह सांगता समारंभ निमित्त विविध पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला .या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेशजी कदम,आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा . लक्ष्मण बिटाळ ,विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु .शिल्पा देसरडा (सी.ए.), युवा उद्योजक शुभम राठी, गौरव जाजू ,विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते, उपप्राचार्या श्रीम. रूपा खेडकर , उपमुख्याध्यापिका सौ . मंदाकिनी भालसिंग, पर्यवेक्षक सुनील आव्हाड, श्रीम. पुष्पलता गरुड, प्रा . शिवाजी पोटभरे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी राजेशजी कदम आपले विचार व्यक्त करताना पुढे म्हणाले की ,विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा विद्यालयात पार पाडल्या जाव्यात यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या कोणत्या ना कोणत्या सुप्त गुणांचा विकास होत असतो व विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांचा विकास करण्याची संधी मिळत असते असे सांगितले .जीवनामध्ये अति आत्मविश्वास हा नेहमी घातक ठरत असतो त्यामुळे सतत प्रयत्नशील राहून विद्यार्थ्यांनी आपले निश्चित ध्येय गाठावे असेही ते म्हणाले.सर्व पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले .
या कार्यक्रम प्रसंगी आबासाहेब काकडे यांच्या जयंती माह निमित्त २५ जून ते २५जुलै या दरम्यान घेण्यात आलेल्या वक्तृत्व, चित्रकला , मेहंदी , हस्ताक्षर( मराठी, हिंदी, इंग्रजी ,संस्कृत) , रांगोळी , निबंध , काव्यवाचन , बुद्धिबळ , कुस्ती, रस्सीखेच, स्लो सायकलिंग, हस्तकला, अबॅकस, गोशाळा स्वच्छता, विविध शिष्यवृत्ती या सर्व स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या प्रमुख अतिथी विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी कु.शिल्पा देसरडा (सी.ए.)आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता कठोर परिश्रम घेऊन जीवनात यशस्वी व्हावे व शाळेच्या आणि आपल्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.लक्ष्मण बिटाळ यांनी केले .त्यांनी कार्यक्रम आयोजना पाठीमागील हेतू नमूद केला .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री .ज्ञानेश्वर गरड व प्रा.विजय बांडे यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य संपतराव दसपुते यांनी केला .कार्यक्रमास विद्यार्थी ,पालक शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू -भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.