येणाऱ्या काळातील आव्हाने पेलण्याची ताकद नव्या साहित्यिकांत निर्माण होणे ही काळाची गरज – प्रा. डॉ. सखाराम डाखोरे

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
प्रगतिशील लेखक संघ आणि आदिवासी समाज बांधव द्वारा पहिले राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन राजूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे एकदिवशीय आदिवासी साहित्य संमेलन घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर सखाराम डाखोरे हे बोलत होते.
त्यांनी आपल्या भाषणात फुले शाहू आंबेडकरी प्रणित सामाजिक न्यायाचे महत्त्व अधोरेखित केले. गेल्या 70 वर्षातील आदिवासी साहित्याचा आढावा घेताना त्यातील उनिवा त्याची शक्ती स्थळे आणि येणाऱ्या काळातील आव्हाने पेलण्याची ताकद नव्या साहित्यिकांना निर्माण होणे ही काळाची गरज आहे असे आग्रहाचे प्रतिपादन डाखोरे यांनी केले.
संमेलनाच्या अध्यक्षपदावरून राकेश वानखेडे असे म्हणाले की, आदिवासींच्या इतिहासाचा विपर्यास कसा झाला? गावगाड्यांचे नियम आदिवासी समाजाला लागू होतात का? लागू होणार नसेल तर गावगाड्याच्या साहित्यासारखे आदिवासी साहित्य कसे असू शकेल? असे महत्त्वाचे प्रश्न त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केले.
संमेलनाचे उद्घाटक साहित्यिक संजय दाभाडे तर स्वागताध्यक्ष आयुक्त वसंत पिचड हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून आदिवासी साहित्य समोरील आव्हाने यासंबंधी आपल्या विवेचनातून विचारमंथन केले. आदिवासी साहित्याचे आद्य प्रवर्तक महात्मा फुले हे होय असे आग्रहाचे प्रतिपादन करताना ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’ हे सर्वच साहित्यकारांचं संविधान आहे. ते आदिवासी साहित्याला सुद्धा लागू आहे. असे म्हणाले.
भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.राजुर सारख्या आदिवासी बहुल बाजारपेठेच्या गावात साहित्य संमेलन होण्याची ही पहिलीच वेळ होती. एड. एन. एम. देशमुख महाविद्यालय राजुर येथे झालेल्या एकदिवशीय साहित्य संमेलनात परिसरातून मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते. यावेळी ग्रंथदिंडी काढण्यात आली, त्यामध्ये युवक युवती आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग दिसून आला. तसेच महाराष्ट्राची प्रगतिशील परंपरा तिचे दर्शन होईल अशी रचना करण्यात आली होती. अनेक आदिवासी बांधव पारंपारिक आदिवासी वेशभूषेमध्ये या संमेलनासाठी उपस्थित होते. आदिवासी साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष, अभ्यासक सुनील गायकवाड यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.

दुसऱ्या सत्रामध्ये “आदिवासी साहित्य व साहित्याची लक्षणे” या विषयावर महत्त्वाचा परिसंवाद झाला. पुणे विद्यापीठाचे डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महत्त्वपूर्ण परिसंवादात प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, साहित्यिक संजय दोबाडे, तसेच राजू ठोकळ सतीश लेंभे तसेच आदिवासी साहित्याचे अभ्यासक रवी बुधर यांनी महत्त्वपूर्ण विषयाची मांडणी केली.
जवळपास 50 पेक्षा अधिक कवींचा सहभाग असणारे काव्य संमेलन हे या कार्यक्रमातील महत्त्वाच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. काव्य स्पर्धेत विजयी ठरलेल्या देवचंद महाले या कवीला राज्यस्तरीय आदिवासी साहित्य भूषण महाकरंडक पुरस्कार यावेळी अध्यक्षांच्या हस्ते बहाल करण्यात आला.
आदिवासी समाजात सामाजिक सांस्कृतिक आणि सृजनशील काम करणाऱ्या बांधवांना राज्यस्तरीय आदिवासी समाजभूषण पुरस्कार देऊन यावेळेस सन्मानित करण्यात आले. ज्यामध्ये सिनेट सदस्य नितीन तळपाडे विशाल पोटिंदे, सखाराम गांगड, कविराज बोटे जगन्नाथ सावळे, जयेश पटेकर, जालिंदर आडे, जयंत पटेकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ भोये, आदिवासी अभ्यासक सुरेखाताई लेंभे यांनी केले तसेच प्रास्ताविक आयोजकांच्या वतीने तानाजी सावळे यांनी केले.