इतर

राष्ट्राच्या पुनर्निर्माण व विकास प्रक्रियेत कामगार आणि युवक शक्तीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे -केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय


राष्ट्रनिर्मितीत कामगार शक्तीचे योगदान सर्वोपरि – केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय
भारतीय मजदूर संघाच्या २१व्या त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशनाचे पुरी येथे भव्य उद्घाटन
पुरी (ओडिशा) येथे
राष्ट्राच्या पुनर्निर्माण व विकास प्रक्रियेत कामगार वर्ग आणि युवक शक्तीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न कामगार आणि युवकांच्या कष्ट, क्षमता व समर्पणातूनच साकार होऊ शकते, असे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले आहे .
पुरी येथील स्व. ओमप्रकाश अग्रवाल सभागृहात शुक्रवार, दिनांक 06 ते 8 फेब्रुवारी रोजी आयोजित भारतीय मजदूर संघाच्या (BMS) २१व्या त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
डॉ. मांडवीय म्हणाले की, भारत हा नेहमीच सामर्थ्यशाली आणि सक्षम राष्ट्र राहिला आहे. मात्र दीर्घकाळ परकीय सत्तेखाली राहिल्यामुळे देशाची तेजस्विता काही काळ मंदावली होती. “आज पुन्हा एकदा कामगार आणि युवकांच्या शक्तीच्या जोरावर भारताला सशक्त करण्याचे कार्य सुरू आहे. निश्चितच भारत पुन्हा जगात उजळून निघेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय मजदूर संघाने सातत्याने कामगारांच्या हितासाठी कार्य केले असून, संघटनेने केंद्र सरकारला दिलेल्या अनेक महत्त्वाच्या सूचना गांभीर्याने विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. या अधिवेशनातून पुढे येणाऱ्या सूचनांनाही प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. भारतीय मजदूर संघ ही केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातीलही एक मोठी कामगार संघटना असल्याचा गौरवोद्गार त्यांनी काढला.
केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कामगार कायद्यांचा उल्लेख करताना डॉ. मांडवीय म्हणाले की, या कायद्यांमुळे लैंगिक भेदभाव नष्ट होतो, समान कामासाठी समान वेतनाची हमी मिळते तसेच आरोग्य व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित होते. हे कायदे सर्व कामगारांच्या हिताचे असून “नव्या भारताच्या” उभारणीत मोलाचे ठरणार आहेत. कामगारांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असून विकासाच्या प्रवासात कोणीही मागे राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री. हिरण्मय पंड्या यांनी अध्यक्षीय भाषणात संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. भारतीय मजदूर संघ देशातील क्रमांक एक कामगार संघटना बनली असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक कामगार संघटनांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केल्याचे त्यांनी सांगितले. L-20 मंचाचे नेतृत्व करण्याचा मान BMS ला मिळाला असून, एकसंघ राहून ७० वर्षे पूर्ण करणारी ही एकमेव संघटना असल्याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला. आगामी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी BMS ची भूमिका अधिक प्रभावी राहील, असेही त्यांनी नमूद केले.
तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची सुरुवात ध्वजारोहण व दीपप्रज्वलनाने झाली. व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य श्री. बी. भागय्या, रशियातील FNRP संघटनेचे अध्यक्ष श्री. सर्गेई चेर्नोगायेव, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) प्रतिनिधी सुश्री मिसिको मियामोटो, तसेच BMS चे संयुक्त महामंत्री श्री. सुरेंद्र पांडेय उपस्थित होते.
अधिवेशनाचे संचालन अखिल भारतीय महामंत्री श्री. रवींद्र हिमते यांनी केले, तर स्वागतपर भाषण भारतीय मजदूर संघ ओडिशा अध्यक्ष श्री. बादल महाराणा यांनी केले.
या राष्ट्रीय अधिवेशनात देशातील २८ प्रांतांमधून सुमारे २,५०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राकडून अधिवेशनात केंद्रीय पदाधिकारी , प्रदेश कार्यकारणी सदस्य, असे 198 पदाधीकारी प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे व सरचिटणीस किरण मिलगीर यांच्या नेतृत्वात सहभागी झाले आहेत.
कामगारांच्या समस्यांबाबत, कंत्राटी कामगारांबाबत अत्यंत महत्वपूर्ण मागणींबाबत प्रस्ताव पारित करण्यात येणार आहेत. अशी माहीती अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी कळविण्यात आले आहे.
ब्राझील, रशिया, नेपाळ, इंडोनेशिया, चीन आदी देशांतील कामगार संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती शिशु निकेतन, पुरी येथील विद्यार्थ्यांनी “वंदे मातरम्” सादर केले. संपूर्ण परिसरात
“भारत माता की जय”,
“देश के हित में करेंगे काम”,
“काम का लेंगे पूरा दाम”
अशा देशभक्तीपर घोषणा दुमदुमून गेला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button