संगमनेरात लोक अदालत मध्ये साठ लाखाची घरपट्टी- पाणीपट्टी वसूली!

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर पंचायत समितीच्या वतीने आयोजीत लोक अदालत मध्ये विविध ग्रांमपंचायतीच्या थकलेल्या घरपट्टी व पाणीपटटीची सुमारे साठ लाख रूपयांची वसूली करण्यात आली आहे. लोक अदालत च्या माध्यमातून जिल्ह्यातील ही सर्वाधिक वसूली मानली जाते आहे.
याकामी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी विशेष प्रयत्न केले आहे. येत्या काळात उर्वरीत रक्कम वसूलीसाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत.
संगमनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीकडील घरपट्टी , पाणीपट्टी थकबाकी होती.त्या थकबाकीदार असलेल्या
10, 220 खातेदाराना थकबाकी भरणा करणे बाबत कोर्टामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 2,.247 इतक्या खातेदारांनी तडजोडी अंती रु 59 लाख 13 हजार 960 चा भरणा केला आहे.
संगमनेर तालुक्याची अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वसुली झालेली आहे. या कामी अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रथम श्रेणी. वाय.एच.अमेठा, वरिष्ठ स्तर अतिरिक्त मुख्य न्यायाधिश श्री.एम.एच शेख, वरीष्ठ स्तर अतिरिक्त मुख्य न्यायाधिश एस.एस.बुद्रुक. कनिष्ठ स्तर दिवानी न्यायाधिश पी.डी.देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका बार असोशिएशनचे वकील श्री.विनोद ढोमसे,वकील श्री.फंटागरे यांच्या सहकार्यांने या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या संदर्भाने न्यायाधीश महोदयांनी नुकताच पंचायत समितीचे सभागृहामध्ये खास वेळ देऊन ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून जास्तीत जास्त वसुली कशी करता येईल या दृष्टीने मार्गदर्शन केले होते. यासाठी श्री अनिल नागणे गटविकास अधिकारी यांनी संगमनेर पंचायत समिती मार्फत उत्तम कामगिरी केली जाईल याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने दिले होते. त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने व्यक्तिशः लक्ष घालून उच्चांकी वसुली होईल या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा केल्याने इतक्या मोठया प्रमाणावर वसूली करण्यात यश मिळाले आहे. यासाठी तालुक्यातील पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ ,कक्ष अधिकारी श्री.राजेंद्र तिटमे, विस्तार अधिकारी पंचायत श्री राजेंद्र कासार, श्री राजेंद्र ठाकूर , श्री सुनील माळी, श्री सदानंद डोखे यांनी परिश्रम घेतले.
जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन
गावच्या विकासात ग्रांमपंचायतीचे योगदान महत्वाचे आहे.त्याकरीता घरपटटी व पाणीपटटीची वसूली देखील महत्वाची आहे. मात्र जनतेने सदरचा कर वेळत भरल्यास विकासाच्या प्रक्रियेला हातभार लागण्यास मदत होते. संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले होते त्याला तालुक्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांनी उत्तम प्रतिसाद दिला. तसेच थकबाकीदारांनी वसुलीची रक्कम भरणा करून उच्चांकी वसुलीचा टप्पा गाठता आला आहे. या लोक अदालतीच्या माध्यमातून 92 ग्रांमपंचायतीचे 2097 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे.त्या माध्यमातून सुमारे 59 लाख 72 हजार 645 रुपयांची वसूली करण्यात आली आहे. जनतेने वसूली कामी सहकार्य करावे
अनिल नागणे-
गटविकास अधिकारी,
संगमनेर तालुक्यातील या ग्रांमपंचायतीची विक्रमी वसूली..
संगमनेर तालुक्यातील 92 ग्रांमपंचायतीच्या 10, 220 थकबाकीदारांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या.त्यापैकी 2, 247 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे
सर्वाधिक वसूली झालेल्या ग्रांमपंचायतीमध्ये –
घुलेवाडी – 7 लाख 61 हजार 547,
आश्वी बु – 5 लाख 79 हजार ,
पेमगिरी —5 लाख 51 हजार 124 ,
गुंजाळवाडी — 4 लाख 85 हजार 803,
सुकेवाडी — 3 लाख 84 हजार 050,
वेल्हाळे — 3 लाख 56 हजार 080,
आंबी खालसा— 2 लाख 71 हजार 513,
समानापूर — 1 लाख 94 हजार 940,
निमगाव जाळी– 1 लाख 78 हजार 466,
मंगळापूर — 1 लाख 13 हजार 235 वसूली करण्यात आली आहे.19 ग्रांमपंचायतीच्या वसूली शुन्य झाल्या आहेत.