उपोषणाच्या ईशाऱ्यानंतर अवसायकाकडून प्रतिज्ञापत्र सादर …!

बचाव समितीचे उपोषण स्थगित
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी:
पारनेर सहकारी साखर कारखान्याचे अवसायक राजेंद्र निकम न्यायालयाचे आदेशानंतरही आपले म्हणणे सादर करत नसल्याचे पार्श्वभुमीवर बचाव समितीने त्यांना उपोषणाचा इशारा देताच प्रतिज्ञापत्र सादर केले आहे . देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्यावर गेल्या अठरा वर्षांपासुन अवसायक कार्यरत आहे . हा कारखाना सन २००४ ला अवसायनात घेतत्यानंतर आठ वर्षे भाडेतत्वावर देण्यात आला होता . कायद्यानुसार अवसायनाची मुदत सहा वर्षांची असते . या काळात कामकाज अपुरे राहीले तर प्रत्येकी एक वर्षांची अशी चार वेळा मुदतवाढ देता येते . पारनेरच्या अवसायकालाही चार वेळा मुदतवाढ देवुन १५ जुन २०१५ रोजी अवसायकाचा वाढीव मुदतीचाही कार्यकाळ संपला होता
तरीही अवसायनाचे कामकाज पुर्ण झाले नसल्याचे शासनाला कलवुन त्यांनी मुदतवाढ मागीतली होती, तत्पुर्वी शासनाने शेवटची मुदतवाढ देताना यापुढे मुदतवाढ मिळणार नसल्याचे त्यांना स्पष्टपणे कळविले होते तरीही तत्कालीन साखर आयुक्त बिपिन शर्मा यांनी राजेंद्र निकम यांची अवसायक म्हणून जुन २०१६ ला बेकायदेशीर नियुक्ती दिली होती . याच नियुक्तीला पारनेर कारखाना बचाव समितीने आक्षेप घेत खंडपीठात आव्हान दिले आहे . या बेकायदेशीर नियुक्तीवरून औरंगाबाद खंडपिठाने सहकार सचिव , साखर आयुक्त व अवसायक यांना नोटीस काढले होते परंतु अनेक तारखा उलटुनही त्यांचे म्हणने सादर केले जात नव्हते म्हणून कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने त्यांना उपोषणाचा इशारा दिला होता परंतु उपोषणाचा इशारा देताच
अवसायक यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे .
यानंतर कारखाना बचाव समिती आपले प्रति म्हणने न्यायालयासमोर
सादर करणार आहे व त्यानंतर या विषयावर न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे बचाव समितीकडून सांगण्यात आले.
कायद्यातील तरतुदीनुसार अवसायनाचा कालावधी संपला असला तरीही व शासनाकडून मला मुदतवाढ मिळाली नसली तरीही मला साखर आयुक्तांनी तेव्हा नेमलेले होते शिवाय शासनाने मला मुदतवाढ दिलेली नसली तरी काम थांबण्याचे स्वतंत्र आदेश दिलेले नाहीत व त्यामुळेच मी अवसायनाचे कामकाज चालुच ठेवलेले आहे असे अवसायक यांनी दाखल केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे .
कारखाना विक्री करारात अवसायकाने देणी असलेली कारखान्याची सर्व देणी कारखाना खरेदीदार क्रांती शुगर यांनी स्विकारलेली होती त्यामुळे २१ ऑक्टोबर २०१५ रोजीच अवसायक यांचे कर्तव्य संपृष्टात आले होते . तरीही अवसायक यांनी कारखान्याच्या मोठ्या मालमत्तांची विल्हेवाट लावली आहे व अनेक गैरव्यवहार केलेले आहेत . आज रोजी कारखान्याकडे सुमारे दिडशे कोटी रुपयांची मालमत्ता शिल्लक आहे . या संस्थेवरील अवसायकाचा ताबा हटवून सभासदांकडे देण्याची कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीची मागणी आहे तसेच या संस्थेवरील अवसायक राज हटवुन पुनर्जीवनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे असे बचाव समितीचे रामदास घावटे यांनी सांगितले .