संगमनेर चे शासकीय विश्रामगृह बनले राजकीय कार्यकर्त्यांचा अड्डा,

दारू ,मटण ,हफ्ते वसुली च्या रोज रंगतात पार्ट्या,
संजय साबळे
संगमनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील सरकारने मंत्री, आमदार, खासदार, शासकीय अधिकारी, न्यायपालिकेचे अधिकारी, विशेष सरकारी पाहुणे यांच्यासाठी ठिक ठिकाणी सुसज्ज अशा शासकीय विश्रामगृहाची निर्मिती केली. येथे या विशेष पाहुण्यांच्या राहण्यासाठी कर्मचारी व जेवणाची सोय व्हावी यासाठी एका विशेष सरकारी आचाऱ्याची (स्वयंपाकी) सोय केली. मात्र संगमनेर शहरातील सुसज्ज अशा शासकीय विश्रामगृहात मात्र मागील अनेक वर्षापासून या स्वयंपाक्याची प्रचंड मनमानी व लुटमार सुरू असून त्याने या शासकीय वास्तुला खासगी खानावळ व दारू मटण शौकीनांचा अड्डा बनविला आहे.
रोज याठिकाणी अशासकीय नागरीकांच्या पार्ट्या सुरू असून रात्री अपरात्री तर नको ते उद्योग येथे चालत असल्याचा संशय अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र हे सर्व येथील वरिष्ठ अधिकारी डोळे बंद करून पहात असल्याने संपूर्ण यंत्रणेलाच किड लागल्याची शंका व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील सर्वात सुसज्ज व चांगले विश्रामगृह म्हणून ओळख संगमनेरचे शासकीय विश्रामगृहाकडे पाहिले जाते. परंतु या विश्रामगृहाला बदनाम करण्याचे काम येथील खानसाॅं करत करीत आहे. तशी या खानसाॅंच्या हाताला चवच भारी आहे. त्यामुळे येथे येणारे सर्व वरीष्ठ अधिकारी, शासकीय पाहुणे तृप्त होऊन जातात आणि शाबासकी देतात. याच शाबासकीचा गैरफायदा घेत या खानसाॅंने या शासकीय आवाराला खासगी हाॅटेल बनवून ठेवले आहे. येथील डायनिंग हाॅलमध्ये चालणऱ्या खासगी पार्टीत चालणारे एसी, लाईट, पंखे, पाणी याचे बील सरकार भरते मात्र पैसे कमावतो हा खानसामा. तसेच या पार्ट्या केवळ शाकाहारी व शुध्दीतच होत नसून मद्याचे खंबेच्या खंबे रिचवत मटणावर ताव मारला जातो. याचे पुरावे म्हणून या शासकीय आवारात अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या आढळून येतात.
दुसरीकडे याठिकाणी जो व्यक्ती वास्तव्य करणार आहे किंवा जेवण करणार आहे त्यांच्या नोंदी ठेवल्या जातात. परंतु अनेक वेळा एखाद्या खासगी संघटनांचे, पक्षाचे कार्यकर्ते, स्वयंघोषित पुढारी, अधिकाऱ्यांचे नातेवाईक जणू आपल्या हक्काची जागा असल्यासारखे येथे पडून असतात. त्यांच्याकडून चांगली टिप किंवा जेवणाची ऑर्डर मिळत असल्याने त्यांना रान मोकळे करून दिले जाते. गैर कायद्याने येथील व्हिआपी सुटचा वापर केला जातो. या ठिकाणी कोण येतोय कोण राहतोय, कोण कुणाला घेऊन राहतोय याचा कुणालाच थांगपत्ता नाही. येथील शासकीय खानसामा हा येथेच खानावळ चालवत नाही तर बाहेर डबे पुरवतो व त्यासाठी हजारो रुपये अनाधिकृत पणे कमवत आहे. या डब्यांमध्ये अधिकाऱ्याच्याही वाटा असल्याचे नाकारता येत नाही. आणि सुविधा तर सर्व शासकीय पुरवतो. तसेच सर्व ठेकेदार आणि शासकीय कर्मचारी यांच्या मधील टक्केवारी चे वाटप ही येथे खुलेआम होते त्यामुळे येथे कायम वर्दळ असते ,संगमनेर मधून बाहेरगावी जाणारे बिनधास्त पणे गाड्या पार्क करून जातात त्यांना ही कोणाचा वचक राहिला नाही
हां महाभाग रोज अवैधपणे बाहेरील व्यक्तींना दामदुप्पट पैसे घेऊन शासकीय बडदास्त ठेऊन खाऊ पिऊ घालतो. सदर वास्तु ही शासकीय आहे म्हणून सर्वात सुरक्षित आहे. या ठिकाणी काहीही उद्योग केले तर पोलीस धाड पडणार नाही याची खात्री असल्याने बिनदिक्कतपणे याच्या मर्जीने सर्व सुरळीत चालू असते. पगार, जागा शासनाची आणि कमाई मात्र या स्वयंपाक्याची. हे सत्र थांबून या वास्तुची प्रतिष्ठा जपावी, व गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या या मजोर आचाऱ्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी सर्व सामान्य नागरिक करत आहे.