ढवणवाडी, पांढरकरवाडी निघोज परिसरात बिबट्याची दहशत, ग्रामस्थ भयभीत.

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
निघोज परिसरातील ढवणवाडी, पांढरकरवाडी परिसरात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत झाले असून वनसंरक्षक विभागाने लवकरात लवकर पिंजरे देउन या परिसरात लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी युवा नेते रुपेश ढवण व शिवसेनेचे निघोज – आळकुटी जिल्हा परिषद गटाचे विभाग प्रमुख महेंद्र पांढरकर यांनी मुख्य अधिकारी रेष्मा पाठक यांच्याकडे केली आहे.
यावेळी ढवण व पांढरकर तसेच ग्रामस्थ सचिन ढवण,उमेश ढवण, राजेंद्र ढवण यांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन निवेदन दिले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते. अधिकारी अनुपस्थित होते. याबद्दल संबंधितांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या आहेत. गेली दोन दिवसांपूर्वी गणेश ढवण यांच्या वस्तीवर म्हशीवर हल्ला करुन बिबटयाने दहशत निर्माण केली आहे. यापुर्वीही बिबट्याने शेळ्या, कुत्रे यांच्यावर हल्ला करीत अनेक जनावरे फस्त केली आहेत. वेळोवेळी बिबट्याने दहशत निर्माण करुण शेतकरी बांधवांना त्रास दिला आहे. या बिबट्याच्या भितीने दिवसा शेतात जाणे शेतकरी,महिला मजुरांना मुश्किल झाले आहे. वेळोवेळी पारनेर येथील वनसंरक्षक विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना सांगितले आहे. मात्र सातत्याने दुर्लक्ष करण्याचे काम होत आहे. कर्मचारी संख्या कमी आहे. पिंजरे उपलब्ध नाहीत अशी कारणे सातत्याने सांगितली जात आहेत.
दोन ते तीन वर्षांपूर्वी वडनेर,जांबुत, चोंभूत या ठिकाणी माणसांवर हल्ले करुण त्यांना यमसदनी पाठवले आहे. यासाठी परिसरात पिंजरे द्यावेत तसेच वनसंरक्षक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी वारंवार या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करावे तसेच ज्या शेतकऱ्यांची जनावरे फस्त केली आहेत. त्यांना रोख स्वरूपात नुकसान भरपाई देण्याची गरज असताना हे खाते निष्क्रिय असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. लवकरात लवकर पिंजरे न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा रुपेश ढवण व महेंद्र पांढरकर तसेच ग्रामस्थांनी दिला आहे.