अकोल्यातील सेना नेत्यांचे वर्तनाने मा.क.प . संतापले

अकोले प्रतिनिधी
अकोल्यात गत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकी बाबत शिवसेना नेत्यांचे बेताल वक्तव्याने माकप ने संताप व्यक्त केला आहे शिवसेनेचे हे वर्तन क्लेश दायक असल्याचे माकप चे जिल्हा सचिव कॉ सदाशिव साबळे यांनी म्हटले आहे यामुळे विधानसभा निवडणुकी पुर्वीच वादाची ठिणगी पडली आहे
शिवसेना (ऊ.बा.ठा.) पक्षाने मागील आठवड्यात अकोले रेस्ट हाउस याठिकाणी पत्रकार परिषद घेऊन व आज श्री. मधुकर तळपाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली आगामी वाटचालीची भूमिका स्पष्ट केली. लोकशाहीमध्ये असे करण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. मात्र असे करताना दोन्ही पत्रकार परिषदांमध्ये शिवसेनेने तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे योगदान हेतुत: अव्हेरले आहे. पक्ष याची गंभीर दखल घेत आहे.
दोन्ही पत्रकार परिषदांमध्ये २०१९ च्या ‘एकास एक’ चा उल्लेख करण्यात आला. मात्र असे करताना मा.क.प.चे तीन उमेदवार कॉम्रेड नामदेव भांगरे, कॉम्रेड एकनाथ मेंगाळ, कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांचे त्यावेळी भरलेले अर्ज एकास एक प्रक्रियेला सहकार्य करण्यासाठी पक्षाने काढून घेतले व त्यावेळी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वार्थाने सर्वस्व पणाला लावले हे वास्तव शिवसेनेने उल्लेख टाळून नाकारलेले दिसते आहे. कॉम्रेड नामदेव भांगरे व कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी यापूर्वी विधानसभा लढून चांगली मते घेतली होती हे ही शिवसेनेचे नेते सोयीने विसरले आहेत. मा.क.प.चा उल्लेख टाळताना शिवेसेना (ऊ.बा.ठा.)चे नेते व श्री. मधुकर तळपाडे २०१९ च्या निवडणुकीत व २०२४च्या लोकसभा निवडणुकीत निष्क्रिय किंवा विरोधात राहिलेल्यांचा मात्र हिरीरीने उल्लेख करताना दिसले.
लोकसभा निवडणुकीला काही थोडेच महिने उलटलेले असताना व लोकसभा निवडणुकीत दमडीचीही अपेक्षा न ठेवता मा.क.प.ने शिवसेना (ऊ.बा.ठा.)च्या उमेदवारांचा जीव काढून प्रचार केलेला असताना, शिवसेना (ऊ.बा.ठा.)च्या नेत्यांचे हे वर्तन कार्यकर्त्यांसाठी अत्यंत क्लेशदायक आहे.
पहिल्या पत्रकार परिषदेत झालेली चूक मा.क.प.ने शिवसेनेच्या लक्षात आणून देऊन सुद्धा आज दुसऱ्या पत्रकार परिषदेतही शिवसेनेच्या नेत्यांकडून तीच चूक करण्यात आल्याने, यापुढे त्यांच्याकडून किंवा इतर कुणाहीकडून मा.क.प.ला गृहीत धरण्याची चूक होऊ नये यासाठी माकपला नाविलाजाने याबाबत जाहीर भूमिका घ्यावी लागली आहे.
शिवसेना (ऊ.बा.ठा.)च्या नेत्यांनी दोन्ही पत्रकार परिषदांमध्ये आमचे ‘मशाल’ हे चिन्ह तळागाळात पोहचले आहे त्यामुळे आमची दावेदारी अधिक मजबूत असल्याचे सांगितले. मा.क.प.ने व महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी हे चिन्ह तळागाळात पोहचविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत जीवाचे रान केले ही आमची चूक झाली का ? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
विधान सभेची आगामी निवडणूक लढविण्यासाठी मा.क.प. इच्छुक आहे. तसा दावा पक्षाने मा. श्री. शरद पवार साहेब, मा. उद्धव ठाकरे साहेब व मा. नाना पटोले साहेब यांच्याकडे केला आहे. पक्षाने तालुक्यात विविध आंदोलने व मेळाव्यांना चालना देत तयारी सुरु केली आहे. मात्र महाविकास आघाडीची एकजूट मजबूत रहावी यासाठी परिपक्वता दाखवीत पत्रकार परिषदा घेऊन वातावरण गढूळ करणे टाळले आहे.
शिवसेना (ऊ.बा.ठा.) पक्षाने लोकसभा निवडणुकीत मा.क.प.ने केलेल्या सहकार्याची जाणीव ठेवत झालेली चूक तत्काळ सुधारावी व या बाबत भूमिका जाहीर करावी.असे माकप चे जिल्हा सचिव कॉ. सदाशिव साबळे यांनी म्हटले आहे