आपण करतो तो प्रवास,साधू संत करतात ती तीर्थ यात्रा -हभप नारायण महाराज काळे

दत्ता ठुबे
पारनेर – आपण करतो तो प्रवास , साधू संत करतात ती तीर्थ यात्रा असते.माणसाने मरण्याअगोदर एकदा तरी तीर्थ यात्रा करावी असे प्रतिपादन श्री क्षेत्र पैठण येथील ज्ञानमार्तंड श्री स्वामी कथाकार हभप नारायण महाराज काळे यांनी केले आहे.
स्वामी भक्त अनिल आवारी व स्वामी भक्तांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या रांधेच्या माळवाडी येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान येथे स्वामी कथेच्या तिसऱ्या दिवशीच्या निरोपण प्रसंगी ज्ञानमार्तंड हभप नारायण महाराज काळे बोलताना पुढे म्हणाले की ,माणसाला जोपर्यंत हात पाय आहे तोपर्यंत पायी तीर्थयात्रा करावी तो पर्यंत करू नये.देवांच्या चरणस्पर्शाने नदया पवित्र झाल्या आहेत.श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट नंतर सर्वांत जास्त मंगळवेढे येथे १२ वर्षे राहिले पण तेथील लोकांना त्यांचा महिमा कळला नाही.आपल्या महाराष्ट्रातील लोकांना माणूस मेल्याशिवाय त्याचे महत्व समजत नाही, त्यासाठी त्याने मरावे लागते ही शोकांतिका आहे पण हे रांधेतील लोकांना महाराज कळाले म्हणून येथे मोठे भव्य व दिव्य मंदीर उभे राहिले.जसे श्री क्षेत्र अक्कलकोटचे महत्त्व आहे तसेच रांधे नगरीचे आहे,महाराज उदंड राहिले,उदंड फिरले,पण त्यांना खरे प्रेम मिळाले,ते रांधे नगरीत मिळाले,म्हणून ते येथे आले , त्यासाठी त्यांना प्रेमाने व श्रद्धेने शरण गेले पाहिजे.सोमवारी महाराजांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. आपण येथे जे काही मांदिआळीच्या रूपाने जमलो आहोत त्याला कारण केवळ अनिल आवारी व त्यांचे सहकारी कारणीभूत आहेत.
महाराजांचा श्री क्षेत्र अक्कलकोट मध्ये पहिला भक्त हा मुस्लिम समाजाचा होता.तेथे त्यांनी सामाजिक ऐक्य व समतेचा संदेश दिला.पंढरपूर मध्ये त्यांनी सांगितले की मीच विठ्ठल आहे.जोपर्यंत घराचे मंदीर करता येत नाही तोपर्यंत मंदीरात जाऊ नये.प्रत्येक गावाच्या चौकात ओटा असतो व तेथे बसलेला चांडाळ चौकडीनेही महाराजांना सोडले नाही.
महाराजांनी आपल्या निस्सीम भक्त असलेल्या चोळाप्पाची विविध प्रकारची परीक्षा पाहिली पण ते त्या परीक्षेत पास झाले तरी देखील महाराजांनी सर्व प्रथम चोळाप्पांच्या पत्नीला सर्व प्रथम आपले मूळ रूपातील अद्भूत दर्शन दिले.जसे की विठ्ठलाची निस्सीम भक्ती करणाऱ्या संत तुकारामाच्या आधी त्यांची पत्नी जिजाऊंना दिले.ही स्वामी कथा सर्वत्र ऐकायला मिळत नाही.जो भक्त एकनिष्ठ होऊन ही कथा ऐकतो,त्याच्या अडचणी दूर होतात, त्याला अंतकरणातून महाराजांचे दर्शन होते. एवढा या कथेचा महिमा आहे.या कथेच्या माध्यमातून मला महाराज जेथे गेले तेथे जाण्याची संधी मिळाली.जन्म मृत्यूच्या फेऱ्यात वाचायचे असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे भजन व नामस्मरण करा.काही गोष्टी अशा आहेत की त्या फिरविल्याशिवाय टिकत नाहीत खराब होतात.जसे की भाकरी व घोडा.साधू-संतांना एकांत प्रिय असतो. त्यांना एकांतात विचार सुचतात म्हणून ते एकांतात असतात तर दुर्जनांना दुष्विचार सुचतात.भूतकाळात काय झाले, ते उकरून काढून वा त्यांचे चिंतन करून वर्तमान काळ खराब करायचा नाही.महाराजांना निशंकपणे शरण जा,ते प्रत्येकाच्या तना व मनात आहे.आपल्याला बोलावून जे प्रेम जेथे मिळत नाही तेथे जाऊ नये व जेथे न बोलवता गेल्यावर प्रेम मिळते तेथे हक्काने जावे असे ज्ञानमार्तंड हभप नारायण महाराज काळे यांनी सांगितले.

स्वामी कथेच्या तिसऱ्या दिवशी भजन गात महिला व पुरुष भाविक भक्त तल्लीन होऊन टाळया वाजवत,नाचत,गात होते.कथेला पुर्ण विराम दिल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती नंतर महाप्रसादाने कथेची सांगता करण्यात आली.ऐकण्यासाठी पारनेर,जुन्नर तालुक्यातील स्वामी भक्त,दुचाकी,चार चाकी,अगदी ट्रॅक्टरमध्ये बसून मोठ्या संख्येने रांधेच्या माळवाडी येथे उपस्थिती लावत असे.
सोमवार दि.३१ रोजी रांधेच्या माळवाडी येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान मंदीरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुर्तीची वाजत गाजत रांधे गावातील सर्व देवी देवतांची भेटी घेत मिरवणूकीव्दारे वेद व मंत्रांच्या उदघोषात प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.