इतर

जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून मिशन मोडवर काम करावे-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

अहिल्यानगर दि. ११- जलसंपदा विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी व अन्य घटक जोडले गेले आहेत. त्यामुळे जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज दिल्या.

जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल २०२५ कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याच्या आयोजनासंदर्भात जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. यावेळी जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता संजीव टाटू उपस्थित होते. बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर अधिक भर दिला जावा. लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून विभागाची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे या पद्धतीने जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात यावेत. सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे होण्यासाठी कालवे प्रवाही राहणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कालवे दुरुस्ती, कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा मध्ये कालव्यांची स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्यात यावे. या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.

कालवे स्वच्छ आणि प्रवाही राहिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन शेवटच्या घटकाला पाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळे जनसामान्यात शासनाची प्रतिमा उंचावेल. या कामात स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचाही सहभाग घेऊन जलव्यवस्थापनाच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. तसेच कालव्यांवरील अतिक्रमणे काढण्यासही प्राधान्य देण्यात यावे.

जलसंपदा विभागाच्या ताब्यात असणाऱ्या मालमत्तांची मोजणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. या जागांची ७/१२ वर नोंदणी करून घ्यावी. यासाठी ॲक्शन प्लॅन करण्यात यावा. जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या जागेवरील अतिक्रम काढण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाणी वापर ठरला असून त्यानुसार पाणी वापराचे ऑडिट करून घ्यावे. पाण्याची गळती रोखण्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका आणि आणि क्षेत्रीस्तरावर उपाययोजना राबविण्यात याव्यात.

‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ मध्ये जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, शेतकरी, पाणी वापर संस्था संवाद, थकीत पाणीपट्टी वसुली, जल व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग, अनधिकृतपणे पाणी वापर रोखणे, सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयांनाही प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.

‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ जिल्ह्यात यशस्वीपणे राबवा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच जलसाक्षरता वाढविण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान जिल्ह्यात ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ पूर्वतयारीच्या राज्यस्तरीय आढाव्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. आशिया बोलत होते.
बैठकीस उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ मध्ये जिल्ह्यातील कालव्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवडीची मोहिम यानिमित्ताने हाती घेण्यात यावी. जिल्ह्यातील उद्भवातून अनाधिकृतपणे पाणी उपशाबाबत माहिती घेण्यात यावी. जलसाठ्यांच्याभोवतीचे प्रदुषण कमी करण्याच्यादृष्टीनेही आवश्यक ती कार्यवाही करावी. पंधरवड्याच्या माध्यमातून पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत जनमानसांमध्ये विविध माध्यमांद्वारे व्यापक स्वरुपात जागृती करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button