भंडारदरा धरण परिसरातील आदिवासी आदिवासींच्या शेतजमिनी वर बिल्डररांचा डोळा!

: अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसरात असणाऱ्या साम्रद, रतनवाडी, घाटघर, पांजरे, उडदावणे, मुरशेत, कोलटेंभे, शेंडी, भंडारदरा गाव या परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी शेंडी येथील वनविभागाच्या चेक नाक्यावर काल रास्ता रोको केला.
भंडारदरा धरणाच्या नवगाव डांगणाच्या परिसरात बिल्डरांनी वर्ग दोनच्या जमिनी कशा खरेदी केल्या याची तात्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.

भंडारदरा धरणाच्या परिसरातील अनेक आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ह्या भंडारदरा धरणामध्ये गेलेल्या आहेत.इंग्रजांच्या राजवटीमध्ये पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे पुनर्वसन झालेच नाही. सन १९६० नंतर आदिवासी शेतकऱ्यांना शेतजमिनी कसण्यासाठी देण्यात आल्या. मात्र या शेतजमीनी वर्ग दोन या नावाने तसेच १०० टक्के पोट खराबा असल्याची नोंद शेतकऱ्यांच्या ७/१२ वर लावण्यात आली. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी शेतजमिनीमध्ये विविध पिके घेऊनही शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई किंवा पीक विमा ह्या शेतकऱ्यांना मिळत
नाहीत. मागच्या वर्षी संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी शैलेशे हिंगे यांनी संगमनेर येथे सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत भंडारदरा परिसरातील वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ करण्यात याव्यात असे आदेश दिले असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

त्यानुसार अधिकाऱ्यांनी भंडारदराच्या आदिवासी भागात येऊन काही पंचनामे केले असल्याचेही या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या सर्व वर्ग २ च्या जमिनी असून आदिवासी भागामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये अनेक बाहेरच्या बिल्डरांनी आदिवासी जमिनीला हात घातला आहे. ह्या सर्व जमिनी कशाच्या आधारे बिल्डरांनी खरेदी केल्या याची चौकशी शासनाकडून तात्काळ व्हावी, अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे.
यावेळी आदिवासी बांधवांचे नेते अमित भांगरे, भरत घाणे,पांडुरंग खाडे, मारुती बांडे, संतोष सोडणार, त्रिंबक बांडे, लक्ष्मण गांगड, दत्ता ढगे, रावजी मधे,संपत झडे, भाऊराव उघडे, अर्जुन खोडके, एकनाथ गांगड, शांतारामगिऱ्हे, सागर रोंगटे, ज्ञानेश्वर झडे,शिवाजी झडे, अशोक उघडे, बच्छु चंदर गांगड, एकनाथ गांगड,पोकळे, पोपट मुठे आदींसह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
सदर आंदोलनाच्यावेळी आंदोलकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही आपल्याकाही मागण्या सादर केल्या. सदर मागण्यांच्या बाबतीत वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावीत यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून महसूल विभागाने मात्र अपेक्षित प्रतिसाद न दिल्यानेआंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. आंदोलना दरम्यान राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्याअधिपत्याखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.




