मोदी सरकारच्या पोषण अभियानाचा ६ कोटीहून अधिक महिला, बालकांना लाभ! –सौ. अश्विनी थोरात

अहमदनगर प्रतिनिधी
गर्भवती महिला आणि बालकांसाठी मोदी सरकारने सुरु केलेल्या आरोग्य, पोषण अभियानाचा फायदा देशातील ६ कोटीहून अधिक महिला, बालकांना झाला असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर महिला जिल्हा अध्यक्ष सौ. अश्विनी थोरात यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित्त मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाल्या की, देशातील महिलांचे , बालकांचे आणि गर्भवती स्त्रियांची कुपोषणापासून रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पोषण अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी केली आहे. याअंतर्गत २०१४ मध्ये मिशन इंद्रधनुष सुरु करण्यात आले. या अभियानात मार्च २०२२ पर्यंत ४.१० कोटी बालकांना विविध आजारांवरील लसी देण्यात आल्या आहेत. घटसर्प, डांग्या खोकला (पर्टुसिस), टिटॅनस, पोलिओ, क्षयरोग, गोवर आणि हिपॅटायटीस बी या सारख्या गंभीर आजारांवर लस देणे, सर्व लहान मुलांचे तसेच गर्भवती महिलांचे लसीकरण करणे हे ‘मिशन इंद्रधनुष’चे उद्दिष्ट आहे. 352 जिल्ह्यांमध्ये पूर्ण लसीकरण केले जाणार आहे.
याखेरीज गर्भवती महिलांसाठी आरोग्य सेवा सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने मातृत्व वंदना योजना सुरू करण्यात आली आहे. गर्भवती महिलेला पौष्टिक आहार मिळावा यासाठी त्या महिलेच्या बँक खात्यात ५ हजार रुपये जमा केले जातात. तसेच प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला गर्भवती महिलांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार मोफत दिले जातात. गर्भवती महिलांसाठी देशभरातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू आहे. या योजनेत आतापर्यंत सुमारे ६ हजार कोटी रुपये गर्भवती महिलांना देण्यात आले आहेत. या योजनेच्या महिला लाभार्थ्यांची संख्या सुमारे २ कोटी आहे. अशी माहितीही त्यांनी दिली. दुर्गम भागातील अल्प उत्पन्न गटातील महिला, बालके अनेक आजारांवरील उपचारापासून आर्थिक तसेच अन्य कारणांमुळे वंचित राहतात. या सर्वांना मिशन इंद्रधनुष आणि मातृत्व वंदना योजनेचा फायदा मिळत आहे, अशी माहितीही भाजपा अहमदनगर महिला जिल्हा अध्यक्ष सौ. अश्विनी थोरात यांनी दिली.