शुक्रवारी 17 जानेवारी रोजी अजिंक्य राहणे यांच्या उपस्थितीत सहकारमहर्षी चषकाचे पुरस्कार वितरण

संगमनेर (प्रतिनिधी)–राज्यभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या सहकारमहर्षी T- 20 क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व अंतिम सामन्यासाठी शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता भारताचा माजी कसोटी कर्णधार तथा संगमनेर तालुक्याचा सुपुत्र अजिंक्य रहाणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात ,मा. आ डॉ. सुधीर तांबे हे ही उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.
जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एक जानेवारीपासून राज्यस्तरीय टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे हे 25 वे वर्ष असून यामध्ये 32 संघांचा सहभाग घेतला आहे. या वर्षी या स्पर्धेत रणजी व आयपीएल मधील काही खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
17 दिवस चाललेल्या या स्पर्धेत षटकारा चौकारांच्या आतिषबाजीने स्टेडियम दनानुन गेले .राष्ट्रीय दर्जाचे आयोजन, खेळाडूंना रंगबिरंगी कपडे, संपूर्ण मैदानावर हिरवळ, प्रेक्षकांसाठी चांगली बैठकव्यवस्था, पार्किंग , ऑनलाईन प्रक्षेपण यांचा सर्व आधुनिक सुविधा यामुळे या स्पर्धेला दररोज दहा हजार प्रेक्षकांची उपस्थिती लाभत आहे.
शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांचा वाढदिवसही स्टेडियम मध्ये होणार असून या 25 व्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण व अंतिम सामना होणार आहे यावेळी भारताचा माजी कसोटी कर्णधार तथा संगमनेर तालुक्याचा सुपुत्र अजिंक्य रहाणे पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत. तसेच याप्रसंगी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयहिंद जय संस्थापक मा आमदार डॉ सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात ,गिरीश मालपाणी, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अजिंक्य रहाणे हे संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी चे असून त्यांनी कायम संगमनेर तालुका व आपल्या गावाबद्दल मोठे प्रेम राहिले आहे. तर संगमनेर तालुक्यासाठी अजिंक्य रहाणे हे अभिमान राहिले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याबरोबर वन डे व कसोटी मध्ये देशाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. शांत संयमी व अत्यंत शैलीदार फलंदाज म्हणून त्यांची क्रिकेट जगतात मोठी ओळख आहे. त्याची उपस्थिती हे या सहकार महर्षी चषकाचे मोठे वैशिष्ट्य ठरणार आहे.
तरी या अंतिम सामन्यासाठी संगमनेर मधील तमाम क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ सत्यजित तांबे, जय हिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांनी केले आहे.