इतर

विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करावा— मंत्री अतुल सावे

शिर्डी, दि.१३ – विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा व विचारांचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीपुरता न ठेवता, समाजाच्या उन्नतीसाठी करणे आवश्यक आहे.‌ आपले विचार, मूल्य आणि अभ्यास याद्वारे समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे कार्य विद्यार्थ्यांनी करावे, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी केले.

नेवासा येथील अटलबिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा वार्षिक दीक्षांत समारंभ शिर्डी येथे पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते‌. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रशांत देसरडा, विश्वस्त सचिव कांचन देसरडा, विश्वस्त योगेश देसरडा, प्राचार्य डॉ.प्रशांत गंगवाल, प्रविण महाराज आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.सावे म्हणाले, आपण ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेतले, त्या संस्थेबद्दल आणि तेथील गुरुजनांविषयी आदराची भावना कायम ठेवावी. शिक्षक केवळ शैक्षणिक ज्ञानच देत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडण-घडणीतही मोलाचे योगदान देतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी यशस्वी जीवनाच्या वाटेवर पुढे जातात.

आपल्या जीवनात आई-वडिलांचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या त्यागातूनच आपले शिक्षण शक्य होते. त्यामुळे त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून त्यांच्याप्रति ऋण व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

श्री.सावे म्हणाले पुढे म्हणाले, पदवी मिळवून केवळ ‘डॉक्टर’ होण्याबरोबरच एक जबाबदार, संवेदनशील आणि समाजाभिमुख नागरिक होणे हेच खरे शिक्षणाचे फलित आहे.

यावेळी प्रशांत देसरडा यांचेही भाषण झाले. यावेळी प्रविण महाराज यांचे ‘हात द्या आरोग्यासाठी, मन जिंका विश्वासासाठी’ याविषयावर व्याख्यान झाले.

महाविद्यालयाच्या २०१८ च्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ यावेळी पार पडला. प्रास्ताविक प्राचार्य गंगवाल यांनी केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button