शेतकरी महिला घेणार स्वामींची परीक्षा – “देऊळ बंद २” चा टीझर प्रदर्शित

मुंबई प्रतिनिधी
श्रद्धा आणि अंधश्रद्धा, देव आणि नास्तिक यांच्यातील युद्धाने आजवर अनेक वळणे घेतली आहेत. मात्र, जेव्हा एक सामान्य स्त्री थेट देवालाच परीक्षेला बसवते, तेव्हा काय होते? याच उत्कंठावर्धक विषयावर आधारित २१ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘वटवृक्ष एंटरटेनमेंट’ निर्मित बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित “देऊळ बंद २” चा टीझर आज श्री क्षेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रदर्शित करण्यात आला.

अनेक स्वामी भक्तांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला निर्माते आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी दाखविण्यात आलेल्या टीझरने उपस्थित भक्तांच्या आणि रसिकांच्या मनात चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढली आणि सर्वांनी “देऊळ बंद २” आम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की बघणार अशी ग्वाही दिली.
“देऊळ बंद २ – आता परीक्षा देवाची” च्या टीझरमघ्ये आस्तिक शेतकऱ्याची नास्तिक पत्नी असणाऱ्या स्नेहल तरडे उद्विग्न अवस्थेत आपला नवरा देऊळ बंद करून चावी घेऊन कुठेतरी निघून गेला असल्याची तक्रार घेऊन स्वामींना बोलाविण्यासाठी अत्यंत रागाने वारुळावर दगड मारते आणि स्वामी प्रकट होतात कारण भक्ताने मनापासून बोलावले की देव येतोच. त्यानंतर स्वामींचा विविध वाहनातून प्रवास दाखवताना काही दिग्गज कलाकारांची झलक पाहायला मिळते. पुढच्या प्रसंगात स्वामी म्हणतात “अगं ए नास्तिके प्रत्येक युगात तुझ्या सारखे कित्येक रावण आणि कित्येक दुर्योधन पाहिलेत मी देवाची परीक्षा पाहणारे” त्यावर शेतकरी महिला म्हणते “लिहून देते, कधी शेतकरी नसल पाहिला.” त्यांच्या या संवादावरून “देऊळ बंद २” मध्ये आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक गरीब शेतकरी महिला देवाची सुद्धा परीक्षा घेऊ शकते हे स्पष्ट होत आहे. शेवटच्या प्रसंगात स्नेहल तरडे स्वामींना परत जायला सांगतात पण तू परीक्षेला बसवलं आहे ना? त्यामुळे परीक्षा दिल्या शिवाय मी जाणार नाही…

आता परीक्षा देवाची असे म्हणत स्वामी जायला नकार देतात. नदीकाठचा निसर्गरम्य परिसर, भव्य वडाचे झाड आणि एका बाजूला स्वामींची जरब तर दुसऱ्या बाजूला एका सामान्य स्त्रीचे धैर्य, असा हा सामना खिळवून ठेवणारा आहे. आता या परीक्षेत स्वामी कोणत्या प्रश्नांना समोरे जाणार आणि शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्यांचे निवारण करणार? हे बघण्यासाठी प्रेक्षकांना २१ मे पर्यंत वाट बघावी लागणार आहे.


