इतर

राहता तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या शिफारशीनुसार पेरणी करावी-कृषी अधिकारी भोरे

शिर्डी, दि. ११ :- राहाता तालुक्यातील सर्व सहा मंडळांमध्ये १०० मि.मी. पावसाची नोंद होऊन जमिनीत वापसा स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ मध्ये हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पिकांचे नियोजन करावे व कृषी विभागाने शिफारस केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शास्त्रीय पद्धतीने पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी केले आहे.

राहाता तालुक्यात गतवर्षी ५७ हजार ०८४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती. त्यामध्ये सोयाबीन २६ हजार २५४ हेक्टर, मका ९ हजार २८५ हेक्टर व कापूस ९ हजार ७०६ हेक्टर क्षेत्राचा समावेश होता. यंदा २५ हजार हेक्टरवर सोयाबीन, ११ हजार हेक्टरवर मका व ९ हजार ६०० हेक्टरवर कापूस लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध पाणी, जमिनीचा प्रकार, हवामानातील बदल व बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन पिकांची निवड करावी.

पेरणीपूर्वी माती परीक्षण करून मृदा आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसार नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, झिंक व बोरॉन या अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करावा. रासायनिक खतांचा अतिरेक टाळून शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत व जैविक खतांचा वापर वाढवावा. पेरणीसाठी केवळ प्रमाणित व सत्यप्रत बियाण्यांचा वापर करावा. वाणाची निवड करताना उगवणक्षमता, कालावधी व रोगप्रतिकारक क्षमता विचारात घ्यावी.

कोरडवाहू क्षेत्रात किमान ७५ ते १०० मि.मी. समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच घाई न करता पेरणी करावी. शिफारशीनुसार अंतर, खोली व बियाण्याचे प्रमाण ठेवावे. बीजजन्य व जमिनीतून पसरणाऱ्या रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी प्रथम बुरशीनाशकाची व त्यानंतर रायझोबियम, पीएसबी व ट्रायकोडर्मा या जैविक घटकांची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. राहाता तालुक्यात मध्यम ते भारी जमीन असल्याने अतिरिक्त पाण्याचा निचरा, ओलावा संवर्धन व पिकांची एकसमान वाढ यासाठी बीबीएफ पद्धतीचा अवलंब करणे उपयुक्त ठरते.

पिकांच्या वाढीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करून पीक अवशेषांचा वापर करावा व नत्राचा विभागून वापर करावा. कीड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिवळे व निळे चिकट सापळे, फेरोमोन सापळे व जैविक कीडनियंत्रणाचा वापर करावा. आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. पेरणीनंतर ३० ते ४५ दिवसांच्या कालावधीत तणांचे प्रभावी नियंत्रण करावे.

कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, पीक संरक्षण व जैविक शेतीसह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर पात्रतेनुसार अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. मोरे यांनी केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button