
‘
सोनई (प्रतिनिधी):-
सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ या ४४ व्या ऊस गळीत हंगामाचा सांगता समारंभ आज बुधवार, दि. ८ जुन रोजी सकाळी ९ वाजता कारखान्याचे संस्थापक, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांच्या शुभहस्ते गव्हाणीत शेवटची मोळी टाकून संपन्न होणार आहे.
कारखान्याचे मार्गदर्शक व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कारखान्याने कारखान्याच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच उच्चांकी गळीत करून कार्यक्षेत्रातील व कॉमनझोनमधील संपूर्ण उसाचे गाळप करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गळीत होण्यासाठी निसर्गाची लाभलेली साथ, कारखाना कामगाराबरोबरच ऊस तोडणी कामगार व यंत्रणेचे शेवटपर्यंत मिळालेले सहकार्य व ऊस उत्पादकांना आपला ऊस कुठल्याही परिस्थितीत शिल्लक राहणार नाही याबाबत नेतृत्वासंबंधी असलेला आजवरचा अनुभव व विश्वास यामुळेच हे शक्य झाले .
नानासाहेब तुवर,
चेअरमन मुळा कारखाना.
सांगता समारंभ कार्यक्रमानिमित्ताने कारखान्याचे संचालक निलेश विठ्ठलराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अनिता पाटील तसेच श्री. रंगनाथ लक्ष्मण जंगले व त्यांच्या सुविद्य पत्नी संचालक सौ. अलका जंगले या उभयतांच्या हस्ते व ब्रम्हवृंदाच्या मंत्रघोषात गव्हाणीची विधीवत पुजाविधी संपन्न होणार आहे.
कारखान्याच्या सांगता समारंभ कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध सहकारी, पंचायतराज, धर्मदाय संस्थांचे पदाधिकारी, संचालक त्याचप्रमाणे कार्यकर्ते, कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, व्हाईस चेअरमन कडूबाळ कर्डिले, कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर व संचालक मंडळाने केले आहे.