देश पोलिओ मुक्त ठेवण्यासाठी दोन थेंब महत्त्वाचे – रामदास फुले, .

नेप्तीत पोलिओ लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अहिल्यानगर : प्रतिनिधी–
नगर तालुक्यातील नेप्ती येथे आयोजित करण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अंगणवाडी केंद्रे व आरोग्य केंद्रांवर पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजले. .
नेप्ती येथील चांदपीर वस्ती अंगणवाडीत सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका रंजना चौरे व आशा सेविका छाया भुजबळ यांनी अत्यंत तत्परतेने शून्य ते पाच वर्ष वयोगटातील लहान मुलांना पोलिओचे डोस पाजले.
याप्रसंगी आरोग्य सेवक अभिमन्यू भगवाने ,ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, विलास होले ,रशीद शेख, संदीप भिसे, रमेश बेल्हेकर, मंगेश दळवी, सचिन पुंड ,गणेश चौरे ,अद्विक चौरे, रंजना चौरे, छाया भुजबळ , ज्येष्ठ नागरिक ,आरोग्य विभागाचे अधिकारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लसीकरणासोबतच नागरिकांमध्ये पोलिओ प्रतिबंध, स्वच्छता आणि बालआरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली. प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
आरोग्य विभागाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे गावोगावी लसीकरण केंद्रांवर शिस्तबद्ध वातावरणात मोहीम पार पडली. दुर्गम वस्त्यांमधील बालकांपर्यंतही लसीकरण पोहोचावे यासाठी विशेष पथके कार्यरत होती. पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.

पोलिओ हा बालकांच्या आयुष्यावर कायमस्वरूपी परिणाम करणारा आजार आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील मुलाला प्रत्येक पल्स पोलिओ मोहिमेत लसीचे दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, हीच खरी राष्ट्रीय जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप दिल्यास देश कायमस्वरूपी पोलिओमुक्त राहण्याचे स्वप्न अधिक बळकट होईल.भारताने पोलिओविरुद्ध मोठी लढाई जिंकली असली तरी ही यशोगाथा कायम टिकविण्यासाठी प्रत्येक मोहिमेत शंभर टक्के सहभाग आवश्यक आहे. अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे आणि प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजणे ही प्रत्येक कुटुंबाची सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारी आहे. निरोगी बालक, निरोगी कुटुंब आणि पोलिओमुक्त भारत हेच आपल्या सर्वांचे समान ध्येय असले पाहिजे. देशाच्या पोलिओ मुक्तीसाठी दोन थेंब महत्त्वाचे आहेत .असे यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, पोलिओमुक्त भारत ही केवळ शासनाची मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. गावागावातील प्रत्येक बालक सुरक्षित राहण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा. आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले तर भविष्यातील पिढी अधिक निरोगी आणि सक्षम घडेल. देश कायम पोलिओमुक्त राहावा, यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे ही काळाची गरज आहे.


