पारनेर तालुका प्रशासनात संजय गांधी योजनेचा सावळा गोंधळ

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
शिवसेना नेते सभापती काशिनाथ दाते सर व शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे की तालुका प्रशासनामध्ये सावळा गोंधळाची परिस्थिती झाली आहे
तालुक्यातील गोर गरीब, निराधार शेतकरी लोकांना होत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना कार्यालयाने ज्या निराधार लोकांचे मासिक वेतन चालू आहे त्यांना उत्पन्नाचे दाखले, आधार कार्ड चे झेरॉक्स, हयातीचे दाखले जमा करण्याचे आदेश सोशल मीडिया व प्रिंट मीडियाच्या माध्यमातून दिले आहेत. यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी निराधार लोकांचे मासिक वेतनही बंद केले आहे अशा तक्रारी आमच्याकडे आहेत.
वास्तविक पाहता सध्या जून महिना संपत आला आहे त्यांना एप्रिल महिन्यापासून उत्पन्नाचा दाखला पाहिजे होता तर मार्च महिन्यात लोकांना आवाहन करायला हवे होते. तसेच उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी गावातील तलाठी कार्यालयामध्ये या निराधार लोकांना हेलपाटे घालावे लागणार आहे, तलाठी गावात येतच नाहीत अशा तक्रारी आहे. काहींची अशी परिस्थिती आहे की त्यांना चालताही येत नाही, वयोवृद्ध झाल्यामुळे काहींना दिसायलाही कमी व ऐकायलाही कमी झाले आहे. त्यांनी कोठून उत्पन्नाचे दाखले आणायचे याचा विचार तहसील कार्यालयाने केला आहे का ? तलाठी भेटत नाही यानंतर तहसीलचा उत्पन्नाचा दाखला घ्यायचा, नंतर सेतु कार्यालयात जायचे, तालुक्याच्या काही गावांमध्ये सेतू कार्यालय नाही, तर मग या निराधार लोकांनी उत्पन्नाचा दाखला काढायचा कसा ? हा मोठा प्रश्नच आहे, तर आपण आदेशित केल्याप्रमाणे सदर कागदपत्रे कोठे द्यायचे याची स्पष्टता नाही. तोंडी चौकशी केली असता बँकेकडे द्या, नाहीतर तलाठ्याकडे द्या असे सांगितले जाते. बँकेत विचारणा केली असता आम्हाला माहीत नाही असे उत्तर मिळते, तलाठ्याकडेही तसे सांगितले जाते , मग या निराधार लोकांनी काय करायचे हा प्रश्न या कार्यालयाने तयार करून ठेवला आहे, या सर्व सावळा गोंधळामुळे संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घेणारे निराधार वंचित राहणार आहेत व सरकारचा उद्देश सफल होणार नाही. त्यामुळे आपण आपल्या यंत्रणेमार्फत हयातीचा दाखला घेऊन निराधारांचे वेतन चालू ठेवावे अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल याची असा इशारा त्यानी दिला आहे .