राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले- अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

“
सातारा : राज्यातील अनेक बडे प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यानंतर दुसरे प्रकल्प आणू म्हणताहेत पण यांच्यामध्ये प्रकल्प आणण्याची धमक नाही, अशा शब्दांत राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. साताऱ्यात एका जाहीर सभेत ते बोलत होते.
राज्यातील बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाहीएत. दीड-दोन लाख तरुणांना नोकऱ्या देणारे प्रकल्प परराज्यात गेले. आम्हाला सांगितलं की नवे प्रकल्प आणतो पण यांनी काहीही आणलेलं नाही. आणायची धमक पण नाही यांची, अशा शब्दांत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
मध्यंतरी यांनी गाजर दाखवलं की, शासकीय नोकरभरती करणार ७५,००० तरुणांना नोकरी लावणार. काय झालं त्याचं? कुठे गेल्या त्या नोकऱ्या? काही नाही. वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या अडचणी! मंत्रालयात कोणी बसायला तयार नाही. मंत्रालयात कोण किती दिवस असतात याची माहिती घ्या, असंही पवार यावेळी म्हणाले.
राज्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यांना मदत करणार म्हणून सांगितंल पण कधी करणार? तिथं बसून मदत करावी लागते, लोकांना कुठीही मदत मिळत नाहीए. पण सरकार धिम्म आहे. आमदार निधी वाटपालाही यांनी स्थगिती दिली. आर्थिक पाहणी अहवालात राज्याची पिछेहाट झाली आहे. याचं उत्तर सरकारनं द्यायला नको? असा सवालही अजित पवारांनी यावेळी विचारला.