इतर

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा बिगुल वाजला; ‘’ 5 फेब्रुवारी ला मतदान,!

मुंबई दि 13

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने १५ दिवसांची मुदतवाढ दिली असून, आता या निवडणुका १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज राज्य निवडणूक आयोगाने ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. तर उर्वरित २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार पुणे, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी आणि धाराशिव या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या जिल्हा परिषदांसाठी जिल्हाधिकारी १६ जानेवारीला निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, “या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी उमेदवारांना उमेदवारी अर्ज १६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने जमा करता येणार आहेत. तसेच २२ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, २७ जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. तर २७ जानेवारीलाच उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असून, दुपारी साडे तीन वाजेनंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. तर ०५ फेब्रुवारीला सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार असून, ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेनंतर मतमोजणी सुरु होईल”, असेही वाघमारे यांनी म्हटले.

, या निवडणुकीसाठी २५ हजार ४८२ मतदान केंद्र राहणार असून ही निवडणूक ईव्हीएम मशीनवर होणार आहे. तसेच २२ हजार कंट्रोल युनिट, १ लाख १० हजार बॅलेट युनिट वापरले जाणार आहेत. तर २५ हजार ४८२ मतदान केंद्रात वीज, पिण्याचे पाणी शौचालय असणार आहे. याशिवाय काही पिंक मतदान केंद्र देखील राहणार असून, ती महिला मतदारांसाठी असतील. तर काही आदर्श मतदार केंद्रे देखील असणार आहेत.

या निवडणुकीसाठी एकूण ०२.०९ कोटी मतदार असून, यात ०१.०७ कोटी पुरुष आणि ०१.०२ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तर इतर ४७३ इतर मतदारांचा समावेश आहे. या १२ जिल्हा परिषदांमध्ये ७३१ सदस्य आणि १२४ पंचायत समित्यांमध्ये १४६२ सदस्य निवडले जाणार आहेत. यात महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

यावेळी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, या निवडणुकीत प्रत्येक मतदारांना दोन मते द्यायची आहेत. त्यामधील एक मत जिल्हा परिषदेच्या सदस्य पदासाठी उभे असणार्‍या उमेदवाराला आणि दुसरे मत पंचायत समितीच्या सदस्य पदासाठी उभे असणार्‍या उमेदवाराला द्यावे लागणार आहे.

निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे

नामनिर्देशन स्वीकारणे – १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६
उमेदवारी अर्जांची छाननी – २२ जानेवारी २०२६
अर्ज माघारीची अंतिम मुदत – २७ जानेवारी दुपारी तीन पर्यंत
अंतिम उमेदवार यादी व चिन्हवाटप – २७ जानेवारी दुपारी साडे तीन नंतर
मतदान – ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत
मतमोजणी – ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button