कोकणात रिफायनरी होणारच; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईः कोकणातील रिफायनरी ही आशियातील सर्वात मोठी ग्रीन रिफायनरी असणार आहे. यात केंद्र सरकारच्या तीन कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. जामनगरमधील रिलायन्सच्या रिफायनरीमुळे जशी गुजरातची अर्थव्यवस्था चालते, त्याप्रमाणेच पुढच्या १०-१५ वर्षांसाठी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मदत होणार असून, रिफायनरी होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
यासाठी सर्वांना विश्वासात घेतले जाईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
दरम्यान, पत्रकार शशिकांत वारिसे यांचा हत्येच्या तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नसून, या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यावर गाडी घालून त्यांची हत्या केल्याच्या संदर्भात आमदार अतुल भातखळकर, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, सुनील प्रभू यांच्यासह अनेक आमदारांनी लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील घोषणा केली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, रिफायनरीसमर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी राजकीय नेत्यांचे लावलेले पोस्टरही यावेळी सभागृहात दाखवित वारिसे यांच्या खुनाच्या तपासात राजकीय दबाव येण्याची शक्यता वर्तविली. तर वारिसे यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक आमदार राजन साळवी यांनी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जामनगर रिफायनरीवर संपूर्ण गुजरातची अर्थव्यवस्था चालते. त्याचप्रमाणे या रिफायनरीचा राज्याला पुढची १० ते १५ वर्षे फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील तीन कंपन्या यात गुंतवणूक करतील. आशियातील सर्वात मोठी अशी ही ग्रीन रिफायनरी असणार आहे. राजापूर येथील कातळशिल्पांना या रिफायनरीमुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊनच राज्य सरकार काम करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाचा तपास १६ जणांच्या एसआयटीमार्फत सुरू असून, याप्रकरणी कोणताही राजकीय दबाव आपण येऊ देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
तर पोलिसांनी जोमाने काम करावे यासाठी आपण स्वत: पोलिस महासंचालकांना सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट केले. तर आमदार विनायक मेटे अपघातप्रकरणी जे बाहेरचे तज्ज्ञ तपासासाठी बोलावण्यात आले होते, त्यांचीही मदत घेतली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच वारिसे यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची सानुग्रह मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच जाहीर केली आहे. त्यांच्या वारसांना ती लवकरच देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
कोकणाशी संबंध नसलेल्या दोन आमदारांनी या प्रस्तावित रिफायनरीच्या ठिकाणी चाळीस-चाळीस एकर जमिनी विकत घेतल्या आहेत. अनिल कुमार गायकवाड या अधिकाऱ्याने, तर हजारो एकर जमिन विकत घेतली असल्याची खळबळजनक माहिती जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिली. तर या पंढरीनाथ आंबेरकर याने चार स्थानिक पत्रकारांना जमिनी वाटल्याचेही ते म्हणाले.
एखादा व्यावसायिक जमीन खरेदी करत असेल, तर त्याला अटकाव करता येत नाही. कोणत्या सरकारी अधिकाऱ्याने जर असे प्रकार केले असतील, तर त्याची माहिती घेतली जाईल, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्रात कोणी कोणी जमिनी खरेदी केल्या आहेत, याची संपूर्ण माहिती आमच्याकडे असल्याचेही फडणवीस यांनी आव्हाड यांना सुनावले.
या प्रकरणावरून सभागृहाचे लक्ष वेधताना काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी ‘त्यांचे’ पोलिस, असे संबोधून फडणवीसांवर टीका केली. पटोले यांच्या या टीकेला उत्तर देताना, ‘पोलिस हे फडणवीसांचे नसून, ते महाराष्ट्र राज्याचे पोलिस आहेत. ते योग्य प्रकारे काम करतात. जे चुकीचे काम करतात त्यांना कोणालाही सोडणार नाही,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.