नेप्ती विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप; विद्यार्थ्याकडून विद्यालयास साऊंड सिस्टिमची भेट

अहिल्यानगर- प्रतिनिधी
– नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री. स्वामी आण्णा हजारे शिक्षण संस्थेच्या नेप्ती विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी भव्य व उत्साही समारंभाचे आयोजन नेप्ती विद्यालयाकडून करण्यात आले होते.
या निरोप समारंभास विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती रामदास फुले यांनी दिली . नेप्ती विद्यालय परिसरात आनंद, उत्साह आणि भावनिक वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अर्जुन होळकर होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवासातील अनुभव कथन करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करत यशाच्या शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थांच्या भाषणांतूनही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याबाबत विश्वास व्यक्त करण्यात आला.
या वेळी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयास साऊंड सिस्टिमची भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या या उपक्रमशील भेटीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. त्याचबरोबर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजनही दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते.

समारंभास माजी सरपंच दिलीपराव होळकर, संस्थेचे उपाध्यक्ष अर्जुन होळकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, संतोष चहाळ, जमीर सय्यद, बाळासाहेब जपकर , मुख्याध्यापक महेश जाधव, राजेंद्र झावरे, नानासाहेब घोडके, बाबासाहेब भोर, गोरक्ष कोतकर, संतोष खरमाळे, शिवाजी जाधव, बाबूलाल सय्यद, राधा वामन, सविता कोरडे, श्रद्धा भांड यांच्यासह शिक्षकवृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन शिस्तबद्ध व नेटके करण्यात आले होते. संपूर्ण समारंभात शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील आपुलकीचे नाते अधोरेखित झाले. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा निरोप समारंभ आयुष्यभर स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. .



