पाणलोट क्षेत्रात पावसाची धुवाधार, निळवंडे धरणातून विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

अहिल्यानगर, दि. ७ – निळवंडे, भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात आषाढ सरिंचे तांडव सुरु असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे यामुळे धरण पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी निळवंडे (उर्ध्व प्रवरा) धरणातून आज सोमवार, दि. ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता ६५७० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील काही तासांत विसर्ग टप्याटप्याने वाढण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे प्रवरा नदीपात्रात पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या अकोले, संगमनेर, ओझर बंधाऱ्याखालील गावांसह राहाता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील सर्व नदीकाठच्या गावांना व वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात ठेवलेले जनावरं व तत्सम साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरणे अथवा उशिरा हालचाल टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच संबंधित तालुक्यांतील प्रशासकीय यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे (उर्ध्व प्रवरा धरण विभाग, संगमनेर) यांनी सांगितले.
पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून धरणातील विसर्गात बदल होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाशी संपर्कात राहून दक्षता बाळगावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अकोले तालुक्यातील घाटघर भंडारदरा परिसरात गेल्या 15 मे पासून पाऊस पडत आहे सततच्या पावसाने भात रोपांची प्रचंड नुकसान झाली आहे भात लागवडीसाठी टाकलेली रोपे सडून गेली आहे यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे भात लागवडी कशा कराव्यात असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे जे थोडेफार रोप वाचली आहे ती रोपे पिवळी पडली आहे भात रोपे पिवळी पडल्याने लागवडी योग्य राहिली नाही तालुक्यात पुरेसा युरिया खते उपलबद्ध नसल्याने शेतकरी पिवळी रोपे वाचवीण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे आदिवासी भागात शेतकऱ्यांचे भात रोपे वाया गेल्याने शेतकऱ्यांनां शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आरपीआय चे भंडारदरा विभाग प्रमुख राजेंद्र सोनवणे यानी केली आहे