स्वतःला हरवून पुढे जाणारा यशस्वी होतो – उद्योजक उमेश राठी

रायला महोत्सवास उत्साहात सुरुवात
नाशिक : मुलांनी आपल्यात काय क्षमता आहेत हे ओळखायला शिकले पाहिजे. स्पर्धेच्या युगात नवनवीन तंत्रज्ञान अवगत करायला हवे. जीवन खूप सुंदर आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करून स्वतःला हरवून पुढे जा, मग यश तुमचेच आहे. जीवनात आलेल्या अडचणींतून खूप शिकायला मिळते असे सांगतानाच अपयश आलेला व्यक्ती जीवनात यशस्वी होतो असे मत राम बंधू मसालेचे अध्यक्ष उमेश राठी यांनी व्यक्त केले
ग्रामीण आदिवासी भागातील मुलांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळावी या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, माजी विद्यार्थी संघ आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठात तीन दिवसीय ‘रायला’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन राम बंधू मसालेचे अध्यक्ष उमेश राठी आणि रोटरीचे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर, कृषी विज्ञान केंद्राचे राजाराम पाटील, सचिव रेखा पटवर्धन, मकरंद चिंधडे, रायला चेअरमन विक्रम बालाजीवाले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रोटरी क्लबचे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे आपल्या भाषणात म्हणाले, गरज, स्वप्न कलपना, विचार आणि कृती ही पंचसूत्री अंगीकारल्यास आपण निश्चित केलेल्या ध्येयापासून कोणीही रोखू शकणार नाही. मात्र यासाठी आपल्या आतून बदल घडविण्यास सुरुवात करायला हवी असे सांगून रायलामधून सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रायला महोत्सवात एकूण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रारंभीच्या सत्रात विजय दिनानी यांनी मुलांशी संवाद साधला.
महोत्सवाच्या सुरुवातीस अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी अनिल सुकेणकर, हेमराज राजपूत, मुक्त विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाचे खजिनदार डॉ. संतोष साबळे, सरचिटणीस डॉ. श्याम पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजेश्वरी बालाजीवाले यांनी परिचय करून दिला. मकरंद चिंधडे यांनी आभार मानले.
………………………………………

