सोडूनी पारंपारिक शेती ऐवजी अकोल्यात फुलली फुल शेती

अकोले प्रतिनिधी
भारत देश सण, उत्सव, परंपरा , साजरा करणारा देश म्हणून जगप्रसिद् आहे. नुकताच गणेश उत्सव व त्यापाठोपाठ नवरात्री उत्सव अत्यंत आनंददायी वातावरणात पार पडला. आणि आता देशातील सर्वात मोठा आनंद उत्सव म्हणजेच दीपावली सण येत आहे. या सर्वच सणांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुलांची मागणी असते याचाच अभ्यास करून तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सोमनाथ नवले यांनी उंचखडक येथील आपल्या शेतावर शेवंतीची शेती यावर्षी फुलवली आहे.
अकोले तालुका तसा निसर्ग आणि पर्यावरण संपन्न तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातून वाहणाऱ्या मुळा, प्रवरा व आढळा या नद्यांमुळे तालुक्याला एक उत्तम असे सौंदर्य व सुबत्ता प्राप्त झालेली आहे .तालुक्यातील या तीनही खोऱ्यातील शेतकरी समृद्ध आणि शेतीनिष्ठ आहेत.प्रवरातिरी वसलेले उंचखडक हे बागायत गाव आहे.
शेतीच्या बाबतीत प्रगतशील मानले जाणारे हे बागायत गाव आहे .याच गावातील प्रगतशील शेतकरी फुल शेती तज्ञ सोमनाथ नानासाहेब नवले हे गेली पाच वर्षापासून उत्तम पद्धतीने फुल शेती पिकवत आहेत.पारंपारिक शेतीला फाटा देत फुलशेतीकडे वळले आहेत. फुलशेतीमधील त्यांनी केलेले विविध प्रयोग या भागातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. झेंडू , शेवंती , बिजली , गलांडा या फुलांचे त्यांनी यशस्वीपणे उत्पादन घेऊन दाखवले आहे. चालू हंगामात त्यांनी आपल्या शेतामध्ये शेवंती या फुल पिकाची लागवड केलेली आहे.
सुमारे.. एकरावर त्यांनी शेवंतीची लागवड केली आहे. सफेद आणि पिवळा रंग असलेली शेवंती त्यांनी डिसेंबर 2021 मध्ये केली.शेवंतीचे शंका व्हाईट व ऐश्वर्या यलो हे वाण त्यांनी लागवड केलेली आहेत. गादी वाफ्यावर ठिबक सिंचन व मल्चिंग पेपरचा वापर करून 4.5 x 1.5 फूट अंतरावर लागवड केली . ठिबक मधून समतोल खतांचा वापर व योग्य निगा राखत त्यांनी शेवंतीची बाग डौलात उभी केली .आतापर्यंत त्यांना दसऱ्यापर्यंत सुमारे सव्वा सात लाख रुपये उत्पन्न झाले आहे अजून तीन ते साडेतीन लाख रुपये दिवाळीच्या हंगामामध्ये होणे अपेक्षित आहे. खर्च वजा जाता त्यांना सात ते आठ लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. अत्यंत सचोटीने आणि प्रयोगशील पद्धतीने गेली पाच वर्षे ते फुल शेती पिकवत आहेत.

पारंपरिक पिकांच्या मागे न लागता शेतीमध्ये योग्य तंत्रज्ञान वापरून फुल शेती यशस्वीपणे करून दाखवली आहे. प्रवरा पट्ट्यामध्ये सोमनाथ नवले यांचे फुल उत्पादनासाठी आपुलकीने नाव घेतले जाते. ते हजारो शेतकऱ्यांचे मार्गदर्शक ठरले आहेत. बाजार भाव कमी झाल्यानंतर कधीकधी फुले तोट्यात विकावी लागतात अशी परिस्थिती बोलावल्यास मुलांपासून अगरबत्ती उपपदार्थ बनवण्याचे त्यांचे नियोजन आहे त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना ते करणार आहेत. या कंपनीच्या माध्यमाने स्थानिक युवकांना रोजगार व शेतकऱ्यांच्या फुलांना योग्य बाजार भाव मिळवून देण्याचे त्यांचे ध्येय आहे. टोमॅटो हे मुख्य भाजीपाला पीक या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असते .परंतु गेल्या काही वर्षांपासून टोमॅटो पिकावर व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे हे पीक जवळपास नामशेष होत आले आहे. गेल्या हंगामात टोमॅटो पीक व्यवस्थित न आल्याने त्याच पिकाच्या मल्चिंग पेपरवर त्यांनी चालू हंगामात दोन एकर क्षेत्रावर शेवंतीची लागवड केली आहे.टोमॅटो साठी करण्यात आलेला खर्च वसूल न झाल्याने त्यांनी त्याच क्षेत्रात फुल शेती यशस्वी करून दाखवली आहे हे मात्र विशेष .




