बितनगडावर महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी.

अकोले प्रतिनिधी
वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४८६ व्या जयंतीनिमित्त कळसूबाई मित्र मंडळ,घोटी यांच्या वतीने अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवरील ऐतिहासिक बितनगडावर उत्साहात अभिवादन कार्यक्रम पार पडला.
गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासोबतच तरुण पिढीमध्ये स्वराज्य,शौर्य आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
विविध महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर गेल्या तीन दशकांपासून धार्मिक व ऐतिहासिक उपक्रम राबविणारे कळसूबाई मित्र मंडळ यंदाही महाराणा प्रताप जयंतीनिमित्त बितनगडावर एकत्र आले होते. कळसूबाई शिखर व विश्रामगड यांच्या दरम्यान
असलेल्या या गडावर महाराणा प्रताप,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.यावेळी महाराणा की जय हो’,’शिवा की जय हो’अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
महाराणा प्रताप हे त्याग,तपस्या,बलिदान, स्वाभिमान आणि अखंड स्वातंत्र्याचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांच्या शौर्यगाथेचा गौरव करण्यात आला.तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांना सहकार्य करणारे दुर्गादास राठोड यांचेही स्मरण करून अभिवादन करण्यात आले.गड-किल्ल्यांचा इतिहास,स्थापत्यकला,प्रशासन,युद्धनीती आणि पराक्रमी राजांच्या शौर्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमात कळसूबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्यासह अभिजीत कुलकर्णी,संजय शर्मा,डॉ.महेंद्र आडोळे,निलेश पवार,प्रवीण भटाटे, नगमा खलीफा,रेखा भटाटे,मृणाली सातपुते, प्रियांका मराडे,गोकुळ चव्हाण,सुधाकर तांबे,संजय शेवाळे,चेतन जोशी,नामदेव जोशी,नारायण नाठे आणि गोकुळ सूर्यवंशी सहभागी झाले होते.
======


