काकडे यांनी केली शेवगावात एम. आय. डी. सी.ची मागणी

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
जनशक्ती विकास आघाडी शेवगाव-पाथर्डीचे संस्थापक अॅड.डॉ.विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे, जि.प.सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी उद्योग मंत्री मा.ना. उदयजी सामंत यांची भेट घेऊन शेवगाव तालुक्यात एम.आय.डी.सी सुरू करण्यात यावी अशी लेखी मागणी केलेली होती. जनशक्तीच्या या मागणीला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.नुकतेच औद्योगिक विकास महामंडळाने एम.आय.डी.सी साठी लागणारी माहिती व कागदपत्रे अॅड. काकडे यांना मागितले आहेत. तशा आशयाचे पत्र क्षेत्र व्यवस्थापक यांचे कार्यालयातून प्राप्त झाले असल्याची माहिती अॅड.काकडे यांनी प्रतिनिधींशी बोलतांना दिली आहे.
यावेळी अॅड.काकडे म्हणाले की, शेवगाव येथे एम.आय.डी.सी सुरू करावी ही मागणी आम्ही खूप वर्षापासून शासन दरबारी करत आहोत. आम्ही नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा.ना.उदयजी सामंत यांना मुंबई येथे भेटलो व शेवगाव येथे एम.आय.डी.सी. साठी लागणारी भौगोलिक परिस्थिती कशी चांगली आहे याची माहिती दिली. औद्योगिक क्षेत्र उभारणीसाठी लागणारे शाश्वत पाणी जायकवाडी धरणाचे बॅक वॉटर ०८ ते १० कि.मी. अंतरावर असल्याचे तसेच वीजपुरवठा, दळणवळणासाठीचे रस्ते व जिरायत माळरान जमीनीही उपलब्ध होऊ शकतात, असे मंत्री महोदयांना सांगितले. त्यांनी वरील बाबी सकारात्मक घेऊन तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. एम.आय.डी.सी. साठी लागणारी माहिती कागदपत्रे आम्ही अधिकाऱ्यांना पाठवले आहेत. त्यामुळे शेवगाव येथे एम.आय.डी.सी. होणार म्हणून आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शेवगाव शहरालगत एम.आय.डी.सी. झाली तर शेवगावच्या वैभवात भर पडून शहराचा विकास झपाट्याने होईल. तसेच बेरोजगार युवकांना तालुक्यातच रोजगार उपलब्ध होईल. गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळेल व तालुक्याच्या आर्थिक चक्रात बदल होऊन तालुक्यातील जनतेचा विकास होईल. शेवगाव-पाथर्डी मधील सर्व सामान्य शेतकरी, तरुणांच्या न्याय्य मागणीसाठी जनशक्ती विकास आघाडी नेहमी अग्रेसर असते. एम.आय.डी.सी.साठी जनशक्ती विकास आघाडीने सातत्याने गेल्या दहा वर्षांपासून शासन दरबारी वेळोवेळी मागणी केलेली आहे व आताशी त्या मागणीला कुठेतरी न्याय मिळाल्याचे दिसते आहे असेही ते बोलताना म्हणाले.
यावेळी जि.प.सदस्या सौ. हर्षदाताई काकडे, जगन्नाथ गावडे, अल्ताफभाई शेख, विनोद मोहिते, वैभव पूरनाळे, सचिन म्हस्के, भाऊसाहेब राजळे, भाऊसाहेब सातपुते, अकबरभाई शेख, आबासाहेब काकडे, लखन पातकळ, माणिक गर्जे, अमर पूरनाळे, नामदेव ढाकणे इ प्रमुख उपस्थीत होते.