अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा निर्धार: स्वातंत्र्य दिनी विशेष प्रतिज्ञा

अहिल्यानगर | १५ ऑगस्ट २०२५:
७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, शाळा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीय ध्वजारोहणासोबतच बालविवाहमुक्त जिल्हा घडवण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने “१५ ऑगस्ट २०२७ अखेर अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा” ठराव आज प्रतिज्ञा म्हणून घेण्यात आला. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला स्नेहालय संस्था व उडान प्रकल्पाचे सक्रिय योगदान लाभत आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांत मागील काही महिन्यांपासून उडान प्रकल्पाच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांसोबत कार्यशाळा, प्रशिक्षण, व बालविवाह प्रतिबंधक जनजागृती मोहिमा राबविल्या जात आहेत.
आजच्या दिवशीपासून प्रत्येक गावात ‘बालविवाहमुक्त गाव’ आणि प्रत्येक शाळेत ‘बालविवाहमुक्त शाळा’ हे अभियान औपचारिकपणे सुरू करण्यात आले आहे. यामध्ये शालेय स्तरावर विद्यार्थ्यांनी बालविवाहविरोधी प्रतिज्ञा घेतली, तर गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका, महिला बचतगट आणि युवक मंडळांचा सक्रिय सहभाग दिसून आला.

संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, उडान प्रकल्पाच्या संचालिका ॲड. बागेश्री जरंडीकर, आणि संचालक हनिफ शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
स्नेहालय उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी सांगितले की, “ही फक्त एक प्रतिज्ञा नाही तर समविचारी नागरिकांच्या सामूहिक कृतीने सामाजिक परिवर्तनाचा आरंभ आहे. या अभियानाद्वारे आम्ही प्रत्येक कुटुंब, शाळा, गाव आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून बालविवाहाचे धोके पटवून देणार आहोत.”
या अभियानाला जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, आणि चाईल्ड हेल्पलाइन यांचा विशेष पाठिंबा मिळत आहे. शासकीय, स्वयंसेवी आणि नागरी समाजाच्या एकत्रित प्रयत्नातून जिल्ह्याला बालविवाहमुक्त करण्यासाठी हे अभियान टप्प्याटप्प्याने राबवले जाणार असून, स्वातंत्र्य दिन २०२७ रोजी अहिल्यानगर जिल्हा “बालविवाहमुक्त जिल्हा” म्हणून घोषित होईल, असा विश्वास यावेळी सर्व स्तरांवरून व्यक्त करण्यात आला.




