शिवपानंद शेतरस्ते चळवळ धडकली नागपूर अधीवेशनात
चळवळीच्या लढ्याला यश
मुख्यमंत्री बळीराजा पानंद शेत रस्ते योजनेची घोषणा
नागपूर दि९ शिवपानंद शेतरस्ते चळवळ महाराष्ट्र चे प्रणेते शरद पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली, नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी मुंबई मंत्रालयात शेत रस्त्यांच्या अनेक अडचणींबाबत अजूनही अडचणी असल्याचे, तसेच याबाबातच्या अनेक प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उप मुख्यमंत्री, महसूल मंत्री, महसूल विभागाचे सचिव अशा सर्वांना प्रत्यक्ष भेटून निवेदन पत्र दिलेले होते.
तसेच नागपूर अधिवेशनात राज्यभरातील अनेक शेतकरी येऊन सर्व आमदार व मंत्र्यांना चळवळीची गांधी टोपी तसेच शेतकऱ्यानी पिकवलेले पेरू देऊन अहिंसक व गांधींगिरीच्या मार्गाने लक्ष वेध आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्याच पार्षभूमीवर चळवळीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते, हे नागपूर हिवाळी अधीवेशनाच्या पहिल्याच दिवशी धडकले. त्या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या पोलीस बंदोबस्ताला भेदून काही पदाधिकारी अनेक मंत्री, विरोधी पक्षनेते, व अनेक आमदारांना प्रत्यक्ष भेटून शेत रस्त्यात अजूनही येणाऱ्या अनेक मागण्यांची माहिती दिली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अधीवेशनाच्या पहिल्याच दिवशी “मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना” घोषित करत शेत रस्ते पीडित शेतकऱ्याना काही प्रमाणात दिलासा दिला.
तसेच चळवळीच्या असणाऱ्या सर्व मागण्यांचा मुद्दा, शिवसेनेचे नेवास्याचे आमदार विठ्ठल लंघे यांनी सभागृहात मांडल्याने, शिव पानंद शेतरस्ते चळवळीच्या वतीने कौतुक करत आभार मानले आहेत.
तसेच सर्व आमदारांना वाटण्यासाठी आणलेले पेरू शेतकऱ्यांनी स्वतःही खाऊन व एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला.


