शेवगावा च्या सभेत शरद पवार यांचा सरकार वर हल्लाबोल!

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
आजपर्यंत न पाहिलेले राजकारण आता पाहत आहोत. राज्यात ऊस उत्पादकांसह शेतक ऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र, या कष्टकरी माणसांकडे सरकार किती आस्थेने पाहत आहे का ? याबाबत मनात शंका येते. गुजरातमधील शेतकऱ्यांना कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली. गुजरातचे शेतकरी आमचे दुश्मन नाहीत.पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं होतं? ज्या शेतकऱ्याला दोन पैशांचा फायदा होत होता.त्यावर यांनी बंदी घातली असे सांगत, ‘हे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांचे नाही. असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगाव शहरातील खंडोबामाळ येथे झालेल्या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते-आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, प्रताप ढाकणे, महेबूब शेख, राजेंद्र फाळके, अशोक गायकवाड,ॲड सुभाष लांडे, राजेंद्र दौंड, अभिषेक कळमकर,राजेंद्र दळवी, रामदास गोल्हार, हरीष भारदे आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ‘उसापासून अनेक उत्पादने होतात. देशात साखर आणि उसाचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होते. ज्यांच्या हातात दहा वर्षे सरकार होते, त्यांनी नोटाबंदी करून जनतेला रांगेत उभे केले. यामध्ये ७०० लोकांचा मृत्यू झाला. हे सरकार जनतेचे नाही. सत्तेचा गैरवापर करणे हेच यांचे काम आहे,असा टोला पवार यांनी लगावला.
कोरोनासारखी परिस्थिती असताना नीलेश लंके यांनी 35 हजार लोकांना जीवदान दिले. कोरोनाकाळात हजारो लोक पायी-पायी त्यांच्या गावी गेले. या मेठय़ा संकटाच्या काळात मोदी सरकारने काही केले नाही. मात्र, लंके यांच्यासारख्या लोकांनी खूप काम केले. प्रश्न सोडविण्याऐवजी अटक करण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केली. त्यांनी दिल्लीत आरोग्य आणि शिक्षणासाठी किती काम केले आहे, हे आपण पाहिले आहे.या सरकारची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असून, हे लोक लोकशाही उद्ध्वस्त करीत असतील, तर तुम्हा-आम्हाला एकत्र यावे लागेल,असे आवाहन शरद पवार यांनी उपस्थित जनतेला केले.
शेवगावमध्ये मिनी एमआयडीसी आणता येईल का, यासाठी प्रयत्न करू.ताजनापूरचे पाणी देण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला. नऊ गावांना पाणी मिळावे म्हणून अनेकांनी माझी भेट घेतली. हा प्रश्न आम्ही सोडवू. नगर हा दुष्काळी जिल्हा होता. आता काही ठिकाणी पाणी आले. मात्र, हे काही समाधानकारक चित्र नाही. त्यामुळे विकासाला गती द्यायची गरज आहे,’ असे सांगत शरद पवार म्हणाले, ‘लोकशाहीमध्ये लोकांनी निर्णय घ्यायचा असतो. मात्र, कोणत्याच निवडणुका होत नाहीत. लोकांना लोकशाहीचा अधिकार द्यायचा नाही, ही त्यांची भूमिका असून, सध्या घटनाबाह्य काम सुरू आहे. त्यामुळे या लोकांना रोखण्यासाठी आपण लंके यांच्यासारखे उमेदवार निवडून द्या,’ असे आवाहन करीत, ‘अधिकार वाढविण्यासाठी मोदी सरकारची संविधानात, घटनेत बदल करण्याची भाषा सुरू आहे. अनेक खासदार संविधानात बदल करण्याची भाषा बोलत आहेत,’ असेही पवार यांनी सांगितले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘जनतेचा उमेदवार कसा असतो ते आपण पाहत आहोत. रात्री दोन-तीन वाजेपर्यंत लोक लंके यांच्यासाठी जागे राहतात. काय जादू आहे कळत नाही. म्हणून त्यांच्यामागे आम्ही उभे आहोत. सर्वसामान्यांच्या व्यथा दूर करण्याची धडपड त्यांच्यामध्ये आहे. निलेश लंके आदर्श लोकप्रतिनिधी आहेत. पुढारी कुठे असतील, त्यांना तेथेच राहू द्या. त्रास देणे हाच त्यांचा पिंड आहे. आता सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा पुढे आला आहे. तो आपल्या घरातील मुलगा आहे. आपली लढाई मोठय़ा शक्तीबरोबर आहे. त्यांचे गर्वहरण करायचे आहे. काळजी करू नका, मतदान करा,’ असे आवाहन त्यांनी केले.
निलेश लंके म्हणाले, ‘देशाचे भवितव्य ठरविणारी ही निवडणूक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, ती वाचविण्यासाठी निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही, शेतकरी मरतोय; परंतु सरकार काही करीत नाही. पाच वर्षांपूर्वी ज्यांना संसदेत पाठविले, त्यांनी शेतकऱ्यांचा एक प्रश्न उपस्थित केला नाही. ‘खोटं बोल, पण रेटून बोल’ ही त्यांची सवय आहे,’ असा टोला लंके यांनी विखे यांचे नाव न घेता लगावला. ‘समोरच्या माणसाच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून ‘डमी’ लंके उभा केला आहे. मात्र, तुमच्या जीवावर निवडणूक आपणच जिंकणार आहोत,’ असा विश्वासही लंके यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष हरीश भारदे यांनी आभार मानले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कुसळकर यांनी केले.