कोकणवासी महासंघ,पुणे च्या वर्धापन दिनी देशी वृक्षारोपण;

पुणे | दि. 3 ऑगस्ट 2026 :
कोकणवासी महासंघ, पुणे यांच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी धानोरी अभयारण्य परिसरात देशी वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात संपन्न झाला. बदलते हवामान, घटते पर्जन्यमान, वाढते प्रदूषण आणि पर्यावरणीय असमतोल या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमातून “वृक्ष लावूया, वृक्ष जगवूया” हा सामाजिक संदेश देण्यात आला.
कोकणातील मूळ रहिवासी रोजगार, व्यवसाय, शिक्षण आणि विविध कारणांमुळे पुण्यात स्थायिक झाले असले, तरी आपल्या जन्मभूमीशी असलेली भावनिक नाळ, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक बांधिलकी कायम जपणे ही प्रत्येक कोकणवासीयाची जबाबदारी आहे. याच भावनेतून कोकणवासी महासंघ गेल्या 18 वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि जनहिताच्या विविध उपक्रमांद्वारे समाजहिताचे कार्य सातत्याने करत आहे.
महासंघाने कोकणातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कोकणातील रेल्वे स्थानक, श्री गणेश उत्सव, होळीचा वेळेस परिवहन महामंडल चा जादा गाडी चा पाठपुरावा, रोजगार, शेती, मत्स्यव्यवसाय, पर्यावरण तसेच विविध लोकहिताच्या प्रश्नांसंदर्भात शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कोकणातील नागरिक आणि पुणेकर यांच्यात सामाजिक ऐक्य, परस्पर सहकार्य आणि समाजाभिमुख कार्याची भावना दृढ करण्यासाठी महासंघ सातत्याने कार्यरत आहे.
यावर्षी कमी झालेला पाऊस, वाढते तापमान, जंगलतोड आणि वाढते प्रदूषण या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वड, पिंपळ, चिंच, आंबा, चाफा, मोगरा आणि आपटा या स्थानिक जैवविविधतेस उपयुक्त देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी केवळ वृक्षारोपण न करता प्रत्येक रोपाचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण करण्याचा सामूहिक निर्धार व्यक्त केला.

पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. प्रत्येकाने दरवर्षी किमान एक देशी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकणवासी महासंघाचे अध्यक्ष तुकाराम जाधव होते. प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगरसेविका अश्विनी जाधव, शहर महिला अध्यक्षा राजश्री शिर्के, बांधकाम व्यावसायिक मुकेश गोयल, सुभाष उत्तेकर, गणेश कुऱ्हाडे, येरवडा विभागाचे राजेंद्र घाग, धोंडीराम उत्तेकर, अरविंद म्हाबती, दशरथ माटवणकर, रवींद्र कदम , सुनील मोरे , सुधीर पालकर, यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विभाग अध्यक्ष राजेश पवार यांनी केले.
या वृक्षारोपण उपक्रमाचे प्रभावी नियोजन भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी कोकणवासी महासंघाने आगामी काळात पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि सामाजिक विकासासाठी अशाच लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. कोकणाशी असलेली भावनिक नाळ जपत पुणे शहराच्या पर्यावरण संवर्धनात सक्रिय योगदान देण्याचा महासंघाचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला



