नेप्तीत तुळजापूर देवीच्या पालखीचे उत्साहात स्वागत,

तुळजापूर देवीच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी,
भाविकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी व नवसाला पावणारी देवी :वस्ताद बाबासाहेब पवार
अहिल्यानगर -नगर तालुक्यातील नेप्ती येथे तुळजापूर देवीची पालखी दाखल होताच संबळाच्या कडकडाटात आई राजा उदो -उदोच्या गजरात मोठ्या प्रमाणात हळद कुंकू व फुलाची उधळण करत ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.तुळजाभवानी मंदिरात तुळजाभवानी मातेची पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती.अशी माहिती रामदास फुले यांनी दिली आहे.
पालखी भल्या सकाळी आली असतानाही गावातील महिला भगिनी, अबालवृद्ध यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. गावात पालखी वाजत गाजत, फुलांची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दाखल झाली. या भव्य मिरवणुकीमुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. गावातील सर्वच जाती धर्माचे नागरिक या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले. पालखीची वस्ताद बाबासाहेब पवार यांच्या हस्ते पालखीची विधिवत पूजा करण्यात आली . तसेच गोंधळी पोपट जाधव, राहुल गवारे ,बाबासाहेब जपकर, राजू कुलकर्णी, गणेश जपकर यांच्या हस्ते पालखीची आरती करण्यात आली.
गावात पालखी आणण्यासाठी ग्रामस्थांनी कमी वेळेत उत्तम नियोजन केले आणि नागरिकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला. यानिमित्ताने संपूर्ण गाव एकत्र आले होते. पालखीच्या आगमनानिमित्त ग्रामस्थांनी घरासमोर सडा टाकून सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या.
भाविकांच्या मनातील इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्याची सामर्थ्य तिच्यात आहे. नवसाला पावणारी ही माता प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदाचे सुवर्णक्षण घेऊन येते. आज नेप्ती गावात पालखीचे आगमन झाले आहे, हा सोहळा म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक आहे. गावातील सर्व समाजबांधवांनी यात उत्साहाने सहभाग घेतला, हीच खरी तुळजाभवानी मातेची कृपा आहे. या पालखीमुळे गावात ऐक्याची भावना बळकट झाली आहे. देवीच्या चरणी प्रार्थना आहे . देवीच्या आशीर्वादामुळे नेप्ती गावच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेचे कल्याण होईल असे प्रतिपादन बाबासाहेब पवार यांनी केले.




